पाटणा – भारतात वेगाने लोकसंख्या वाढत असल्याबद्दल अनेक सामाजिक आणि आर्थिक प्रश्न निर्माण होत आहेत. यासाठी लोकसंख्या नियंत्रण करण्याची गरज आहे. याकरिता दोनपेक्षा जास्त अपत्ये असलेल्या कुटुंबाला मतदानाचा अधिकार असू नये अशी सूचना केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केली आहे.
लोकसंख्या दिनानिमित्त त्यांनी आपल्या सामाजिक माध्यमाच्या व्यासपीठावरून आपले मत व्यक्त केले आहे. लोकसंख्येच्या विस्फोटामुळे भारताची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती स्वातंत्र्यानंतर बिघडत चालली आहे. 1947 पासून 2019 या दरम्यान भारताची लोकसंख्या तब्बल 366 टक्क्यांनी वाढली आहे. त्या तुलनेत अमेरिकेची लोकसंख्या केवळ 113 टक्क्यांनी वाढली आहे. या वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे भारतातील आर्थिक सामाजिक संतुलन बिघडत चालले आहे.
नैसर्गिक स्त्रोताचा वारेमाप वापर होऊ लागला आहे. हे रोखण्यासाठी कुटुंब नियोजनाची गरज आहे. अन्यथा भारतात पुन्हा 1947 सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी या विषयावर विचार विनिमय करून लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यावर विचार करण्याची गरज आहे. नंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की ज्यांना दोनपेक्षा जास्त अपत्ये आहेत त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला जाण्याची गरज आहे. त्यामध्ये धार्मिक भेदभाव करण्याची गरज नाही. सर्वच कुटुंबांना हा नियम लागू करण्याची गरज आहे त्याला अपवाद असता कामा नये.