वडीवळे पुलही पाण्याखाली; नऊ गावांचा संपर्क तुटला
वडीवळे धरणातून 4748 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू; वडीवळे धरण 78.15 टक्के भरले
अनेक गावातील शाळांना सुट्टी
नाणे मावळ – नाणे मावळात पावसाची संततधार सुरु आहे. गेल्या पंधरवड्यात सतत चालू असलेल्या पावसामुळे वडीवळे प्रकल्पाच्या पाणी साठ्यात जलद गतीने वाढ झाली आहे. सध्या धरण 78.15 टक्के भरले आहे. शिवाय धरण क्षेत्रात पावसाची तीव्रता जास्त असल्याने धरणाचे पाचही दरवाजे बंद केले नाहीत. धरणाच्या दरवाज्याच्या वरून दोन फुटवरून पाणी धरणातून बाहेर पडत आहे.त्यामुळे सध्या वडीवळे धरणातून 4748 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे,अशी माहिती वडीवळे प्रकल्पातील पाटबंधारे विभागाचे अधिकारी मनोहर खाडे यांनी दिली.
वीस गावांचा संपर्क तुटला –
वडीवळे धरणातून 4748 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कामशेत-नाणे रोड वरील इंद्रायणी नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने रस्त्यावर पाणी साचून नाणे मावळातील नाणे,नवीन उकसान, नाणोली, साई,वाऊंड, कचरेवाडी,कांबरे, करंजगाव,मोरमारेवाडी कोंडीवडे,गोवित्री,पाले, उकसान, वडवली,वळवंती,भाजगाव,कोळवाडी, सोमवडी,थोरण व जांभवली या गावांचा संपर्क तुटला आहे.