मुंबई – मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष मिलींद देवरा यांनी राजीनामा दिल्याने उर्मिला मातोंडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. देवरा हे मुंबई प्रदेश कॉंग्रेस समितीसाठी एक आशास्थान होते असे त्यांनी म्हटले आहे. या संबंधात त्यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की भाजपच्या तुलनेत मुंबईत आपल्याला खूप कमी वेळात मोठे काम करायचे आहे. त्यासाठी त्यांचे नेतृत्व हवे होते. त्यांच्या राजीनाम्याने आपण नाराज झालो आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी अलिकडेच कॉंग्रेस मार्फत सक्रिय राजकारणात प्रवेश केला असून त्यांनी मुंबईतून लोकसभेचीही निवडणूक लढवली होती. देवरा यांच्या राजीनाम्यावर मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी टिकात्मक टिपण्णी केल्याच्या पार्श्वभूमीवर उर्मिलांनी त्यांची स्तुती केल्याला राजकीय महत्व दिले जात आहे. दरम्यान मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे की मुंबई प्रदेश कॉंग्रेसचा कारभार पहाण्यासाठी तीन जणांची एक समिती स्थापन करावी अशी सुचना आपण पक्षाच्या श्रेष्ठींना केली आहे. त्या नावांविषयी पक्षाचे ज्येष्ठ नेते आपल्याशी संपर्कात आहेत असे त्यांनी म्हटले आहे.