संयुक्तराष्ट्रे – संयुक्त राष्ट्रांनी पॅलेस्टाईनच्या निर्वासितांसाठी जो कल्याणकारी कार्यक्रम हाती घेतला आहे, त्यासाठी सन 2019 या वर्षात 50 लाख डॉलर्सची मदत देण्याची घोषणा भारताने केली आहे. या कार्यक्रमाला जगातून अपेक्षित मदत मिळत नाही त्यामुळे हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवता येत नाही त्याबद्दल संयुक्तराष्टांनी चिंता व्यक्त केली आहे.
भारताचे संयुक्तराष्ट्रांतील कायम उपप्रतिनिधी के नागराज नायडू यांनी म्हटले आहे की या आधी भारत या कामासाठी सुमारे दहा लाख डॉलर्स इतकी मदत देत होता पण ती मदत आम्ही आता 50 लाख डॉलर्स इतकी केली आहे.
गेल्या वर्षीही आम्ही इतकीच मदत केली होती. या कामासाठी अजून दोनशे दशलक्ष डॉलर्सची तुट आहे. त्यामुळे पॅलेस्टाईन निर्वासितांना पुरेशी मदत देता येत नाही. त्यांना निधी अभावी आवश्यक सेवाही पुरवता येत नाहींत. त्यामुळे जगातून हा मदतीचा ओघ वाढला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.