मुंबई – राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार जे बोलतात त्याचा नेहमी उलट अर्थ काढायचा असतो. ते जेव्हा संघ किती चिवटपणे काम करतो म्हणतात त्यावेळी त्याचा काय अर्थ काढायचा हे तुम्ही ठरवा, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवार आणि संघ दोघांवरही खोचक शब्दात टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की,’शिवसेना ही किती नेटाने जनतेसाठी काम करते हे मी सांगण्याची गरज नाही, ते कृतीतून दिसते. औरंगाबादेत अंबादास दानवे यांनी पीक विमा योजनेसाठी जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांना एकत्र आणले, विमा कंपन्यांचे अधिकारी तेथे बोलावले आणि त्यातून साडेआठ हजार शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून दिला, हेच मॉडेल सर्व नेत्यांनी राज्यात तातडीने राबवा, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, विधानसभा संपर्क प्रमुख, मंत्री, नेते यांची बैठक त्यांनी आयोजित केली होती. आपली संघटना चांगले काम करते; पण पवारांना संघाचे काम चिवटपणे चाललेले दिसते. खरेतर तेच कितीतरी वर्षे सत्तेला चिवटपणे चिटकून आहेत.’ असेही ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सल्ला होता की,‘प्रचार कसा करायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांकडून शिका.’ याच विधानांवर निशाणा साधत उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमा दरम्यान पवार आणि संघवर खोचक टीका केली आहे.