संगमनेर – संगमनेर तालुक्यात गत रविवारी व सोमवारी झालेल्या वादळी पावसाने मोठा तडाखा दिला असून, यामध्ये 5 ते 7 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या नुकसानीचे पंचनामे करून तहसीलदारांनी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यानुसार तब्बल 106 मालमत्तांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
संगमनेर तालुक्यातील पठार भागासह इतर गावांमध्ये वादळी पावसाने अधिक प्रमाणात नुकसान झाले. साकुर, पिंपळे, नांदुरी दुमाला, सांगवी, पिंपळगाव देपा, वरुडी पठार, खंदरमाळवाडी, निमगाव बुद्रुक, जांभूळवाडी या गावांसह परिसरातील वाड्या-वस्त्यांना अधिक प्रमाणात रविवारी व सोमवारी झालेल्या वादळी पावसाने वादळाचा तडाखा बसला. एकट्या पिंपळगाव देपा गावात 55 हून अधिक घरे व इतर मालमत्तेचे नुकसान झाल्याने अनेकजण उघड्यावर आले आहेत. अद्याप बऱ्याच ठिकाणी अद्यापही पंचनामे सुरू आहेत.
या मालमत्ता नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, मदतीचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. या वादळाने सर्वाधिक डाळिंबाची झाडे पडली आहेत. त्याखालोखाल घरांवरचे छताचे पत्रे उडाले, भिंती कोसळल्याने घरातील संपूर्ण साहित्य, अन्नधान्याचे नुकसान झाले. पठारभागातील बोटा, घारगाव, साकुर, पिंपळगावदेपा, खंडेरायावाडी, सरोळेपठार, अकलापूर, आंबी दुमाला, आंबी खालसा या परिसरात शेततळ्यांचे कागद उडून सुमारे 50 ते 60 शेततळ्यांचे कागद फाटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.