नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात आणि देशातील इतर राज्यांमधील वायू चक्रीवादळाविषयक घडामोडींवर केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेऊन असल्याची माहिती दिली. भारतीय हवामान विभागाने ‘वायू’ चक्रीवादळ हे उद्या पहाटे गुजरात किनारपट्टीवर पोरबंदर आणि महुवा दरम्यान ताशी ११० ते १३५ किमी वेगाने धडकणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वायू’ चक्रीवादळाविषयक घडामोडींची माहिती घेण्यासाठी आपण सातत्याने राज्य सरकारांच्या संपर्कात असल्याचे म्हंटले असून ‘वायू’ चक्रीवादळामुळे उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन दले आणि इतर संस्था अविरत काम करीत असल्याची माहिती दिली.
तत्पूर्वी काल, ‘वायु’ चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्य आणि केंद्रीय मंत्रालये/संस्थांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. आढावा बैठकीनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी तसेच वीज, दूरसंचार, आरोग्य, पेयजल यासारख्या आवश्यक सेवा पुरवण्यासाठी शक्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले तसेच 24 तास नियंत्रण कक्ष सुरु ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीला केंद्रीय गृह, भूविज्ञान आणि हवामान विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘वायू’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची जय्यत तयारी
गृह मंत्रालय संबंधित राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांच्या नियमित संपर्कात आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 26 तुकड्या, बोटी, दूरसंचार उपकरणासह तैनात असून आणखी 10 तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. भारतीय तटरक्षक दल, नौदल, लष्कर आणि हवाई दलाने सज्ज राहण्यास सांगण्यात आले असून टेहळणी करणारी विमानं आणि हेलिकॉप्टर हवाई पाहणी करत आहेत.
काय आहे हवामान विभागाची शक्यता
13 जून 2019 च्या पहाटे गुजरात किनारपट्टीवर पोरबंदर आणि महुवा दरम्यान “वायु’ चक्रीवादळ ताशी 110 ते 135 किमी वेगाने धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, जुनागढ, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्ह्यांच्या सखल भागात 1 ते दीड किलोमीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज आहे. भारतीय हवामान विभाग 9 एप्रिलपासून सर्व संबंधित राज्यांना नियमितपणे हवामानाची माहिती देणारी निवेदने पाठवत आहे.
PM Narendra Modi: Central government is closely monitoring the situation due to #CycloneVayu in Gujarat and other parts of India. I have been constantly in touch with state governments. NDRF and other agencies are working round the clock to provide all possible assistance. pic.twitter.com/i0ng39fsE8
— ANI (@ANI) June 12, 2019