टंचाई आढावा बैठकीत फक्त पाण्याच्या टॅंकरचीच चर्चा
पाथर्डी: जनावरांच्या छावणीतील जनावरांचे टॅग लावून स्कॅनिंग करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जर दोन दिवसात तालुक्यातील छावणीत येऊन त्यांनी स्कॅनिंग नाही केले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तसेच टॅंकरच्या बिलात एखाद्या अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केल्यास आपण तातडीने त्याला निलंबित करण्यास प्रशासनास भाग पाडूत असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला. येथील विठोबाराजे लॉन्समध्ये टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे, जि. प. सदस्य अनिल कराळे, अर्जुन शिरसाठ, मोहन पालवे, नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, पं. स. सभापती चंद्रकला खेडकर, उपसभापती विष्णुपंत अकोलकर,शिवसेना तालुका प्रमुख अंकुश चितळे, माजी तालुकाध्यक्ष रफिक शेख, अमोल वाघ,प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील तसेच सर्वच शासकीय खात्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत केवळ टॅंकरच्या प्रश्नावरच चर्चा केली जाईल असे डॉ. सुजय विखे यांनी सूचित केल्याने केवळ टॅंकरच्या संदर्भातच बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत करंजीचे सरपंच बाळासाहेब अकोलकर, घुमटवाडीचे सरपंच नवनाथ चव्हाण, डमाळवाडीचे सरपंच हरिभाऊ खेडकर, शंकरवाडीचे रावसाहेब गुंजाळ, निंबादैत्य नांदुरचे संजय फुंदे,माळीबाभुळगावचे सरपंच विजय बोरुडे, ढाकणवाडीचे राजेंद्र ढाकणे, तिसगावचे नंदकुमार लोखंडे आदींनी सहभाग घेत आमच्या गावांना नियमित टॅंकर येत नाही व वाढीव खेपा मागूनही प्रशासन त्या देत नाही असा आरोप करत टॅंकरचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
तर फुंदेटाकळीचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब फुंदे यांनी आमच्या गावाला जे टॅंकरचे पाणी येत होते ते पाणी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याने आपल्या शेतात टाकले असल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल झाले असून या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होऊनही तो गावात उजळ माथ्याने फिरत असून त्याला निलंबित करण्याची मागणी या बैठकीत करत या प्रकरणात गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांची बदली करा अशी मागणी करताच डॉ. सुजय विखे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र एखाद्या अधिकाऱ्यांवर पुरावा असल्याशिवाय आरोप करू नका अन्यथा मी बैठक सोडून निघून जाईल अशी तंबी दिली. करंजी येथील सुनील साखरे यांनी फळबागेचा विमा भरूनही विमा कंपन्या मात्र नुकसान भरपाई देत नसल्याचा आरोप केला.
यावेळी बोलताना आमदार शिवाजी कर्डीले यांनी मंजूर टॅंकरपेक्षा निम्मेच टॅंकर गावात जात असून ज्या गावात टॅंकर जातात त्या गावातील सरपंच व इतर ग्रामपंचायतच सदस्यांच्या सह्या रजिस्टरवर घेऊन येण्याचे आदेश दिले. यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे यांनी टॅंकर व छावणी चालकांच्या प्रश्नावर मार्ग काढला जाईल. प्रशासनाने ज्या गावातून वाढीव खेपांची मागणी आहे त्या खेपा तातडीने मंजूर कराव्यात. रोजगार हमी योजनेची कामे वाढवून अधिक मजुरांच्या हाताला काम कसे मिळेल ते प्रशासनाने पहावे असे सुचवले. डॉ. विखे म्हणाले, आज चर्चिल्या गेलेल्या सर्व प्रश्नावर दोन दिवसात मार्ग काढला जाईल.
पूर्वी खासदार फिरकत नाही अशी तक्रार तुम्ही करत होता तर आता टंचाई काळात प्रश्न सुटत नाही म्हणतात मात्र आता परिस्थिती बदलली आहे. तुमची सर्व प्रश्ने सोडवली जातील. पाण्याचे उद्भव कमी अन टॅंकरची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक असल्याने अनेक अडचणी येत असल्या तरीही दुष्काळ पूर्ण हटवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. राजकरण बाजूला ठेऊन दुष्काळाशी दोन हात करायचे आहे. दुष्काळी परिस्थितीत छावणी चालकांनी छावण्या सुरु करून एक प्रकारे चांगले काम केले असून त्यांची सर्व बिले मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून पुढील काळात वांबोरी चारीच्या विषयावर बैठक आयोजित करु असे जाहीर केले.
बांधकाम, वीज, आरोग्य, रस्ते, कृषी या विषयावर चर्चा नाही
या बैठकीस प्रशासनातील सर्वच खात्यांचे प्रमुख अधिकारी दुसऱ्या शनिवारची सुट्टी असूनही उपस्थित असल्याने बांधकाम, वीज, आरोग्य, रस्ते, कृषी या सर्वच विषयावर चर्चा होईल असे अपेक्षित होते. मात्र बैठकीच्या सुरुवातीलाच डॉ. सुजय विखे यांनी या बैठकीत केवळ टॅंकर या विषयावरच चर्चा होईल असे स्पष्ट केल्याने अनेकांना इच्छा असूनही आपल्या गावातील समस्या या बैठकीत मांडता आल्या नाहीत. तर बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर बैठक संपेपर्यंत बसून राहण्याची वेळ आली.