चंडीगढ: पंजाब मंत्रिमंडळातील फेरबदलात महत्वाचे खाते काढून घेण्यात आल्यानंतर माजी क्रिकेटपटूू नवज्योतसिंग सिद्धू प्रतिक्रियेसाठी प्रसारमाध्यमांनाही उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे नॉट रिचेबल बनलेल्या सिद्धू यांच्या पुढील पाऊलाबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांचे संबंध काही दिवसांपासून ताणले गेले आहेत. अशातच पंजाबमध्ये सत्तेवर असूनही कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्याचे खापर अमरिंदर यांनी सिद्धू यांच्यावर फोडले. सिद्धू यांनी शहरी विकासाशी निगडीत स्थानिक प्रशासन खाते प्रभावीपणे हाताळले नाही. त्यामुळे शहरी भागांत कॉंग्रेसचे नुकसान झाले, असे वक्तव्य अमरिंदर यांनी केले. त्यानंतर अमरिंदर यांनी गुरूवारी राज्य मंत्रिमंडळात फेरबदल केले.
सिद्धू यांच्यासह काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये त्यांनी बदल केला. त्याआधी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सिद्धू यांनी दांडी मारली. मंत्रिमंडळ फेरबदल होण्याआधी त्यांनी आपल्या खात्याला लक्ष्य केले जात असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र, फेरबदलानंतर त्यांची प्रतिक्रिया आली नाही. ती मिळवण्यासाठी काही पत्रकारांनी सिद्धू आणि त्यांच्या पत्नी नवज्योत कौर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते दाम्पत्य प्रसारमाध्यमांपासून दूरच राहिले. त्यामुळे सिद्धू यांची पुढील कृती काय असेल याविषयी तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. ते नव्या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारणार का, याविषयीही उत्सुकता निर्माण झाली आहे.