शिलॉंग: मेघालयात सत्तेवर असणाऱ्या नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीपी) शुक्रवारी निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला. तसा दर्जा मिळवणारा एनपीपी हा ईशान्येकडील पहिलाच पक्ष ठरला आहे. देशाच्या ईशान्य विभागातील चार राज्यांत एनपीपीचे अस्तित्व आहे.
लोकसभेचे माजी सभापती दिवंगत पी.ए.संगमा यांनी मूळचा मणिपूरचा पक्ष असणाऱ्या एनपीपीचा विस्तार केला. त्या पक्षाची सुत्रे आता मेघालयचे मुख्यमंत्री कोन्राड संगमा यांच्याकडे आहेत. एनपीपी मेघालयात भाजपच्या पाठिंब्यावर सरकार चालवत आहे. तर मणिपूरमध्ये एनपीपीने सत्तारूढ भाजपला पाठिंबा दिला आहे. एनपीपीने नुकत्याच झालेल्या अरूणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकल्या. त्या पक्षाचा लोकसभेत एक खासदार आहे. राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी आवश्यक निकष एनपीपीने पूर्ण केले आहेत.