कॉंग्रेसकडून घेतला जातोय आढावा
अमेठी – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना यावेळच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तरप्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. त्या पराभवाचा आढावा आता कॉंग्रेसकडून घेतला जात आहे.
लोकसभेच्या सलग दुसऱ्या निवडणुकीत कॉंग्रेसची देशभरात पीछेहाट झाली. राहुल यांच्या पराभवामुळे पक्षावर आणखीच नामुष्कीची वेळ आली. आता राहुल यांच्या पराभवामागील कारणांचा आढावा घेण्यासाठी कॉंग्रेसने एक समितीने बनवली आहे. त्या समितीचे सदस्य गाव पातळीवरही आढावा घेणार आहेत. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे राजकीय कार्य पाहणारे झुबेर खान आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय प्रतिनिधी किशोरीलाल शर्मा त्या आढाव्यासाठी काही दिवसांपासून अमेठीत तळ ठोकून आहेत.
राहुल यांच्या पराभवावरून अमेठी कॉंग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. राहुल यांच्या पराभवाला त्यांचे राजकीय प्रतिनिधी चंद्रकांत दुबे हेच कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्ते करू लागले आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी यावेळी अमेठीतून राहुल यांचा सुमारे 55 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. त्या कामगिरीमुळे स्मृती जायंट किलर ठरल्या आहेत.