सातारा – सातारा तालुका हा तत्कालिन गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्या पाठपुराव्यामुळे निर्मल झाला. 194 गावांमध्ये वैयक्तिक शौचालये बांधून पूर्ण झाले. त्याच काळात पंचायत समितीतील महिलांसाठीही स्वच्छतागृह बांधण्यात आले. मात्र, हे स्वच्छतागृह केल्या कित्येक महिन्यांपासून कुलूप बंद आहे. त्यामुळे पंचायत समितीतील महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचीही कुचंबना होते. ही वेळ आली का? असाही सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
सातारा पंचायत समितीच्या इमारतीला स्वतःची जागा नाही. त्यामुळे इमारतीमध्ये काही विकासात्मक करता येत नाही. असे सातत्याने सांगितले जाते. वास्तविक ही जागा जरी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे असली तरीही मूलभूत सुविधा करण्यासाठी तसा काही निकष असावा असे वाटत नाही. नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहामध्येही अस्वच्छते अभावी कुलूपबंद अशीच अवस्था झाली आहे.
स्वच्छता करणारा बांधकाम विभागाचा कर्मचारीही आता हयात नसल्याने सगळीच दयनीय परिस्थिती बनली आहे. त्यातच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कोणतेही आंदोलन असो, आंदोलनकर्ते, फिरस्ते यांच्याकडून पंचायत समितीच्या स्वच्छतागृहाचा वापर करतात. त्यामुळे स्वच्छतागृहाचा कसाही वापर करत असल्याने स्वच्छतेअभावी हे स्वच्छतागृह कुलूपबंद झाले आहे. तेथील महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कुचंबना होऊ लागली आहे. स्वच्छतेचे धडे देणाऱ्या सातारा पंचायत समितीलाच आता काखेत कळसा आणि गावाला वळसा असा प्रकार दिसत आहे.