देवघर (झारखंड) – लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर नामदारांवर फुटु नये म्हणून कॉंग्रेसने आता सॅम पित्रोदा आणि मणिशंकर अय्यर यांना बॅटिंगला पाठवले आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा फज्जा उडाला तर त्याची जबाबदारी कोणावर तरी टाकावी लागेल ही जबाबदारी आता मणिशंकर अय्यर आणि सॅम पित्रोदा यांनी घेतली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
यातला एक जण 1984 च्या शिख दंगलींबाबत हुआ तो हुआ अशी प्रतिक्रीया देतो तर दुसरा मला जाहीर शिव्या घलतो असे ते म्हणाले. गुजरात दंगलीच्या काळात मला शिव्या घातल्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागल्यानंतर ते पडद्या आड गेले होते पण आता ते पुन्हा उगवले आहेत असे त्यांनी अय्यर यांचे नाव न घेता नमूद केले.
गांधी नेहरू परिवारावर पुन्हा जोरदार टीका करताना ते म्हणाले की एकाच परिवाराने देशावर 55 वर्ष राज्य केले पण त्यांना या 55 वर्षात जे जमले नाही ते आम्ही 55 महिन्यात करून दाखवले.लोकांनी प्रामाणिक सरकार चालवण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली आणि मी ती पार पाडली. माझ्यावर या काळात एकही डाग लागलेला नाही असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.