नवी दिल्ली : काल कोलकात्यामध्ये अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलली आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकांच्या सातव्या टप्प्यातील प्रचार सभांची मुदत उद्या (गुरुवारी) रात्री दहा वाजता संपणार असल्याचे जाहीर केले आहे.
देशभरामध्ये येत्या रविवारी १९ तारखेला लोकसभा निवडणुकांचा सातवा आणि शेवटचा टप्पा पार पडणार असून देशभरामध्ये सातव्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारासाठी शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत मुदत असणार आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल येथील प्रचार एक दिवस आधीच थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या सातव्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील नऊ लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूका घेतल्या जाणार आहेत.