नवी दिल्ली – “आम्ही अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत’, पाकिस्तानला इशारा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानमधील बारमेर येथील प्रचार सभेत केलेल्या या विधानावर कॉंग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला होता. यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार कॉंग्रेसने केली होती. मोदींच्या या विधानाचा अहवाल निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आला होता. त्यानंतर आता यावर निवडणूक आयोगाने आज मोदींना क्लीन चिट दिली आहे. निवडणूक आयोगाच्या मतानुसार, नरेंद्र मोदी यांच्या बारमेर येथील भाषणात कोणत्याही आचारसंहितेचा भंग झालेला नाही.
In a matter related to a complaint concerning alleged violations in Model Code of Conduct in a speech delivered by PM Narendra Modi at Barmer, Rajasthan on 21.04.2019, EC said no such violation of the extant advisories/provisions is attracted. (file pic) pic.twitter.com/Oyx5GMgBti
— ANI (@ANI) May 2, 2019
पाकिस्तानला इशारा देताना मोदी या प्रचार सभेत म्हणाले होते की, पाकिस्तानकडून देण्यात येणाऱ्या अण्वस्रांच्या धमक्यांना भारत आता घाबरणार नाही. भारताची भुमिका आता बदलली आहे. आमच्याकडीलही अणुबॉम्ब आम्ही दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत.
दरम्यान, मोदींच्या या विधानावर आक्षेप घेत कॉंग्रेसने 22 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. पंतप्रधानांनी या विधानाद्वारे सैन्याला अणुबॉम्ब वापरण्याचे आवाहन केले आहे. हा प्रकार आदर्श आचारसंहितेचा भंग करणारा आहे. त्यामुळे मोदींवर काही काळासाठी प्रचारावर बंदी घालण्यात यावी.