नवी दिल्ली – परवा खेळते भांडवल नसल्यामुळे भारतातील आघाडीच्या जेट एअरवेज या कंपनीचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आले आहे. या कंपनीकडे 15 विमाने आहेत. त्याचबरोबर इतरही मालमत्ता आहे. कंपनी पुन्हा सुरू होण्याअगोदर ही विमाने आणि या मालमत्तांचा वापर कसा करता येईल व महसूल कसा मिळेल याबाबत विचार चालू असल्याचे या कंपनीला कर्ज देणाऱ्या बॅंकांनी म्हटले आहे.
स्टेट बॅंकेने सांगितले की, ह्या विमानाच्या वापराबाबत आम्हाला काही कंपन्यांकडून विचारणा आलेली आहे. जर ही विमाने चालू राहिली तर ती चांगल्या अवस्थेत राहतील. त्याचबरोबर काही प्रमाणात महसूल मिळू शकेल.
बॅंकांनी या कंपनीला आठ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिलेले आहे. मात्र कंपनी तोट्यात आल्यामुळे कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यामुळे कंपनीसमोर खेळत्या भांडवलाचा प्रश्न निर्माण झाला आणि कंपनीचे कामकाज काही काळ बंद ठेवावे लागलेले आहे.
दरम्यानच्या काळात या कंपनीचे भागभांडवल नव्या प्रवर्तकांना देण्यासंदर्भात हालचाली चालू आहेत.
याबाबत बॅंका अशावादी आहेत. त्याचबरोबर ही कंपनी शक्य तितक्या लवकर सुरू करावी अशी मागणी या कंपनीच्या वीस हजार कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. त्यांचे आंदोलन चालूच राहणार आहे.
सात वर्षांत सहा विमान कंपन्या बंद
देशातील पहिली खासगी स्तरावरील एअरलाईन्स जेट एअरवेजने बुधवारी अस्थायी स्वरुपात सर्व उड्डाणे बंद करण्याची घोषणा केली आहे. जेट मागील सात वर्षांतील कालावधीत आपली सेवा बंद करणारी सहावी आणि दुसरी मोठी विमान कंपनी आहे.
2012 मध्ये मल्याची किंगफिशर एअरलाईन्स बंद झाली. त्यापाठोपाठ एअर पेगसस, एअर कोस्टा, एअर कार्निवल आणि झूम एअरची आपॅरेशन्स बंद करावी लागलीत. जेटचे आपॅरेशन्स बंद करण्यात आल्यावर जवळपास 20 हजार कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्या भविष्याच्या प्रश्नावर संकट उभारले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्य़ांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे रोजगार वाचविण्यासाठी मागणी केली आहे.