मान्यता नसताना वर्षानुवर्ष शाळा सुरूच
नगर – शिक्षण उपसंचालकांकडून शाळेला केवळ परवानगी देण्यात येते. परंतु ही परवानगी मान्यता गृहीत धरून जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या मान्यता न घेताच तब्बल 350 खासगी शाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांच्या ही बाबत लक्षात आल्यानंतर त्यांनी या सर्व शाळांचे प्रस्ताव तातडीने मागू घेतले आहे.
गेल्या काही वर्षांपासून खासगी शाळा राजरोजपणे सुरू आहे. या शाळांना मान्यता नसतांना देखील त्या कशा सुरू राहिल्या असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अर्थात आरटीई कायद्यानुसार दर तीन वर्षांनी शाळांनी मान्यता व नूतनीकरण करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरी देखील या शाळांनी मान्यता घेतली नसल्याचे समोर आले आहे. या 350 शाळांमध्ये जिल्ह्यातील अनेक नामवंत शाळांचा देखील समावेश आहे. शासन मान्यता प्राप्त अनुदानित अथवा अंशतः, अनुदानिक किंवा विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित तसेच स्वंयअर्थसहाय्यित या खासगी शाळांना बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा (आरटीई) अधिनियम 2009 यांच्या कलम 18 च्या अन्वये शाळांना मान्यता प्रमाणपत्र तसेच नूतनीकरण शिक्षणाधिकाऱ्यांकडून घेणे आवश्यक आहे. परंतु शिक्षण उपसंचालकांनी परवागी दिल्यानंतर ही मान्यता गृहीत धरून जिल्ह्यात वर्षानुवर्ष तब्बल 350 शाळा सुरू राहिल्याचा प्रकार समोर आला.
या शाळांना मान्यताच नाही. हे चित्र समोर आल्यानंतर आता या शाळांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खुद्द शिक्षणाधिकाऱ्यांची हा प्रकार लक्षात आणून या शाळांना मान्यता देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2022 या कलावधीसाठी ही मान्यता घेण्यासाठी या 350 शाळांबरोबरच अन्य सर्वच पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळांना तालुकास्तरावर प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आरटीई दर तीन वर्षांनी मान्यता घेणे बंधनकारक असतांना 350 शाळांना या मान्यता घेतल्या नाहीत.