भंडारा: गोंदिया लोकसभा मतदारसंघातील संयुक्त पुरोगामी लोकशाही महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या निवडणूक प्रचारार्थ साकोली येथे पार पडलेल्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. पंतप्रधान मोदी हे शरद पवार यांच्या कुटुंबावर करत असलेल्या आरोपांचा पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.
पवार म्हणाले, भाजपला मोठे करणाऱ्या दोन नेत्यांपैकी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी दुर्दैवाने आपल्यात नाहीत. मात्र आडवाणी यांची यांनी काय परिस्थिती करून ठेवली हे तुम्ही पाहत आहातच. त्यांनी अडवाणींना अक्षरश: अडगळीत टाकले. हे स्वतःच्या नेत्यांनाच न्याय देत नाहीत तर तुम्हा आम्हाला काय देणार? असा सवाल उपस्थित करत शरद पवार यांनी जनतेला परिवर्तन घडवायचे आवाहन केले.
ते पुढे म्हणाले, भंडारा-गोंदिया हे दोन्ही जिल्हे शेतीसाठी महत्त्वाचे योगदान देणारे जिल्हे आहेत. अवघ्या देशात पिक आणि धान येथूनच जायचे. पण आज हे चित्र पालटले आहे. हे चांगले नाही. शेतकऱ्यांच्या घामाला पैसा मिळेनासा झाला आहे. या सरकारच्या काळात आत्महत्याही वाढल्या आहेत. लोकांनी मोदींना संधी दिली. पण मोदींनी लोकांना फसवलं. पाच वर्षांपूर्वी पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार असताना इथल्या शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य कसे निर्यात करता येईल याचा प्रयत्न करण्यात आला.