-शहाराचे मुख्य ठिकाण असूनही पालिकेचे वाहनतळ नाही
…आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम
…या तर, केवळ दिखाऊपणाच्या कारवाया
अनेक ठिकाणी हॉटल्स आहेत. त्या हॉटेल्सना त्यांची स्वतंत्र पार्किंग असून देखील त्या पार्किंगचा वापर हॉटेलमधील ग्राहक बसविण्यासाठी करतात. मात्र, यावर कोणीही आवाज उठवत नाही. कारण, अनेक राजकीय दबावाखाली अधिकारी आहेत. त्यामुळे कारवाई देखील दिखाऊ होते. खोलवर कारवाई होत नाही. हॉटल्सच्या पार्किंग खुल्या झाल्या, तर अनेक वाहने रस्त्यावर लागणार नाहीत. तसेच वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच वाहनतळचीही गरज भासणार नाही.
वडगावशेरी – विमाननगर मोठी बाजारपेठ आहे. तसेच मोठे मॉल व मोठमोठे आयटी सेक्टर आहेत. तसेच मोठी बाजारपेठ व प्रसिद्ध हॉटेल्स या भागात आहेत. तसेच लोकवस्ती, सोसायट्या, टाऊनशीपमुळे वाहनाच्या प्रमाणातही वाढ झालेली आहे. मात्र, दुर्दैवाने महानगरपालिकेकडून मात्र या भागात एकही वाहनतळ नाही. सहाजिकच, वाहतूक पोलिसांच्या कारवाईला नागरिकांना सामोरे जावे लागते. तसेच अनेकदा वाहन चोरीला जातात. त्यामुळे पार्किंगसाठी पुरेशी जागा व हक्काच्या वाहनतळाची मागणी नागरिक करत आहेत.
विमाननगर कॉर्नर ते श्री कृष्णा चौक, दत्त मंदिर चौक ते सिसिडी चौक, कैलास मार्केट चौक ते दोरबाजी चौक आणि एअरपोर्ट रोड वारंवार वाहतुकीची समस्या उग्र रूप धारण करत आहे. जिथे दिसेल तिथे नागरिक गाड्या पार्किंग करतात.वाहने कुठेही पार्क केली जातात. विमाननगर परिसरात जिथे तिथे रस्त्याच्या कडेला वाहने लावली जातात. पदपथावरही अतिक्रमणे केली जातात. त्यामुळे पदचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागते. अशा अनधिकृत पार्किंगमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते.
याकडे वाहतूक विभागाकडून मात्र कारवाई करताना दिसत नाही. यावर साखळी कारवाई करणे गरजेचे असून देखील वाहतूक विभागाकडून कारवाई होताना दिसत नाही. हा प्रश्न सुटण्यासाठी नागरिकांना सोयीचे वाहनतळ असणे गरजेचे आहे. विमाननगरमध्ये अनेक हॉटेल्स आहेत. मात्र, त्यातील अनेक हॉटेल्सना वाहतूक विभागाकडून न हरकत परवाना दिलेला नाही. तसेच अनेक हॉटेल्समध्ये पार्किंग व्यवस्था नाही. तसेच पार्किंगची जागा मात्र हॉटेल्स टेबल ठेवण्यासाठी वापरण्यात येते.
तरी देखील अशा हॉटेल्सला वाहतूक परवाना नसूनही इतर परवानगी कशी मिळते? मात्र अशा हॉटेल्सच्या समोर अनधिकृत वाहन पार्किंग केल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. त्यातून अनेकवेळा भांडणेही होतात. संध्याकाळच्या वेळी व सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी भीषण असते. कारण, मोठमोठे आयटी कंपन्या आहेत, त्यामुळे कामावरून सुटणारा वर्ग आणि सकाळी येणारा वर्ग मोठा असतो. तसेच शुक्रवार, शनिवार, रविवार या दिसवशी फिनिक्स मॉलला येणारे ग्राहक जास्त असतात. त्यामुळे या दिवशी अनधिकृत पार्किंग मोठ्या प्रमाणार होते व वाहतूक कोंडी गंभीर प्रश्न बनतो. सध्या पालिकेकडून नगरसेविकेमार्फत सकोरेनगरमध्ये वाहनतळासाठी 10 गुंठ्याचे अमिनिटी स्पेस (राखीव जागा) देण्यात आली आहे. त्यावर लवकरच काम सुरू होणार आहे. मात्र सकोरेनगरमध्ये होणारे वाहनतळ हे पूर्ण विमाननगरमधील वाहनपार्किंग करण्यासाठी जर लांबच होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
विमाननगरमध्ये अनेक ठिकाणी पी-1 आणि पी-2 पार्किंग करण्यात येते. मात्र त्यामुळेही वाहतूक कोंडी होत असते. तसेच पी-1 आणि पी-2 सोडून देखील अनधिकृत पार्किंग केली जाते. मात्र, त्यावर वाहतूक विभाग वरवरची कारवाई करतात. वाहनतळ हा मुख्य प्रश्न झाला आहे. विमाननगरमध्ये किमान 2 वाहनतळ होणे गरजेचे आहे. त्यासाठी काही ठिकाणी गार्डनसाठी जागा आरक्षित आहे. त्याजागी वाहनतळ बनवणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
– आरती साठे, सामाजिक कार्यकर्त्या.