बंगळूर -कर्नाटकमधील कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोसळेल, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा यांनी केले आहे. कर्नाटकात भाजपची लाट आहे. त्यामुळे पक्ष राज्यातील लोकसभेच्या 28 पैकी 22 जागा जिंकेल. त्या निकालानंतर कॉंग्रेस आणि जेडीएसमधील मतभेद शिगेला पोहचतील. त्या स्थितीत त्या पक्षांचे आघाडी सरकार तगण्याची शक्यता कमी असल्याचे अनेकांना वाटते. थांबू आणि प्रतीक्षा करू, असे येडियुरप्पा पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांसारख्या दिग्गजांना यावेळच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत भर पडली आहे. त्यामुळे देशभरात भाजपला 300 पेक्षा अधिक जागा मिळतील, असे दावेही येडियुरप्पा यांनी केले.