पुण्यामध्ये चहा शौकिनांची संख्या मोठी आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना तासन्तास अभ्यास करून आलेली ‘मरगळ’ काढण्यासाठी हा ‘अमृतुल्य’ चहा मोठा आधारच आहे. अभ्यास करून सुन्न झालेला मेंदू मग पुन्हा एकदा फ्रेश करण्यासाठी विद्यार्थी चहाच्या दुकानांपुढे मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. पुण्यातील चहा प्रेमींच्या संख्येची प्रचिती येथील एखाद्या पॉश हॉटेलला लाजवतील अशा चहाच्या दुकानांमधून येते.
आयटी कंपनीमध्ये काम करूनदेखील जेवढे उत्पन्न मिळत नाही त्याहीपेक्षा जास्त उत्पन्न काही व्यावसायिक चहाच्या व्यवसायातून कमवत असल्याचे अनेक किस्से गप्पांच्या कट्ट्यांवर रंगलेले असतात. अशा सर्वांच्याच आवडीच्या चहावर पुण्यामध्ये सध्या अनेक एक्सपेरिमेंट देखील होताना दिसत आहेत, यातूनच आता चहाचे निरनिराळे प्रकार सादर करण्यात येत असून तंदुरी चहा, नवाबी चहा, मसाला चहा असे चहाचे नानाविविध प्रकार चोखंदळ चहा-प्रेमींपुढे सादर करण्यात येत आहेत.
“चहाला वेळ नसते मात्र वेळेला चहा हवाच’ या उक्तीप्रमाणे अनेक जण दिवसातून आठ-दहा कप चहा रिचवत असतात. चहा नावाचे द्रव्य हे मरगळ काढण्यासाठी उपयुक्त असल्याचे सर्वमान्य असले तरी चहाच्या सेवनाबाबत तारतम्य बाळगणे गरजेचे आहे.
कोणताही विचार न करता दिवसातून अनेक वेळा पिल्या जाणाऱ्या ‘चहा’चे आपल्या आरोग्यावरील परिणाम पाहुयात :
– भारतीयांचे चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थूलपणा अशा विकारांकडे मोठ्या प्रमाणात ओढल्या जातात.
– दिवसाला 8 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिण्यामुळे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर,अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडावे लागते.
– रिकाम्या पोटी चहा पिण्याने आपली भूक प्रभावित होते किंवा भूक लागणे बंद होते. अशाने आपण आवश्यक पोषणापासून वंचित राहतो. तसेच रिकाम्या पोटी चहा पिण्याचं सर्वात मोठे नुकसान म्हणजे अॅसिडिटी. त्यामुळे गरम चहा पाचक रसांवर प्रभाव टाकतो.
– पचन तंत्र कमजोर होण्यामागे सर्वात मोठे कारण आहे. ते म्हणजे रिकाम्या पोटी गरम चहाचे सेवन. ही समस्या दररोज रिकाम्या पोटी चहा पिण्याने उद्भवते. तसेच उलटी येणे, जीव घाबरणे अश्या समस्या सुद्धा उद्भवतात.
– टपरीवर चहा अॅल्यूमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अॅल्यूमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क अल्झायमर्स (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.
– दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ आणि पित्त वाढवणारा उष्ण गुणाचा चहा असतो. तसेच, नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात.