PM Modi On Lok Sabha Election । आज देशभरातील १३ राज्यातील ८८ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. एकूण १२०६ उमेदवार मतपेटीतून आपले नशीब आजमावत आहेत. त्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे. त्यांनी यासाठी ७ भाषांमध्ये ट्विट केले आहे.
आज ८९ मतदारसंघात मतदान होणार होते. मात्र मध्य प्रदेशच्या बेतूल मतदारसंघातील बसपाच्या उमेदवाराचे निधन झाल्यामुळे याठिकाणची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. मतदानाच्या या दुसऱ्या टप्प्यात दक्षिणेतील केरळ राज्यातील सर्वच्या सर्व २० मतदारसंघात मतदान पार पडेल. तर कर्नाटकातील २८ पैकी १४, राजस्थानमधील १३, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी ८, मध्य प्रदेशमधील ७, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी ५, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ३ आणि मणिपूर, त्रिपुरा, जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एका मतदारसंघात मतदान होणार आहे.
पंतप्रधानांचे ७ भाषांमध्ये ट्विट; मतदारांना आवाहन PM Modi On Lok Sabha Election ।
दरम्यान, या निवडणुकांसाठी पंतप्रधानांनी ट्विट करत दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी सर्व मतदारांना आवाहन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ,”आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्व जागांच्या मतदारांना माझी नम्र विनंती आहे की, त्यांनी विक्रमी मतदान करावे. जितके जास्त मतदान होईल तितकी आपली लोकशाही मजबूत होईल. आमचे तरुण मतदारांना तसेच देशातील महिला शक्तींना माझे विशेष आवाहन आहे की त्यांनी उत्साहाने मतदानासाठी पुढे यावे. तुमचे मत तुमचा आवाज!” असे त्यांनी म्हटले आहे.
लोकसभा चुनाव में आज दूसरे चरण की सभी सीटों के मतदाताओं से मेरा विनम्र अनुरोध है कि वे रिकॉर्ड संख्या में मतदान करें। जितना अधिक मतदान होगा, उतना ही मजबूत हमारा लोकतंत्र होगा। अपने युवा वोटर्स के साथ ही देश की नारीशक्ति से मेरा यह विशेष आग्रह है कि वोट डालने के लिए वे बढ़-चढ़कर…
— Narendra Modi (@narendramodi) April 26, 2024
दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडताना केरळ, राजस्थान आणि त्रिपुरा राज्यातील सर्व मतदारसंघ आटोपणार आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करण्याची मुभा असणार आहे.
महाराष्ट्रात या आठ मतदारसंघात लढत PM Modi On Lok Sabha Election ।
बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात कमालीचा उकाडा जाणवत आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात किती टक्के मतदान होते, हे उद्या दिसेल.