राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेची मागणी
टाकळी हाजी – एसटीएआरएस प्रकल्प नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट) अंतर्गत संकलित मूल्यमापन २ व इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी वार्षिक परीक्षा सकाळच्या शाळेच्या ७.३० ते ११.३० या वेळेत घेण्यात याव्यात, अशी मागणी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल पलांडे यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्याकडे केली आहे.
दि. ७ मार्च २०२४ च्या पत्रानुसार या चाचण्या दि.१ एप्रिल २०२४ ते ४ एप्रिल २०२४ या कालावधीत सकाळी ११ ते १२.३० या कालावधीत आयोजित करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून राज्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात सकाळच्या सत्रात शाळांचे नियोजन केले जाते. या शाळांची वेळ सकाळी ७.३० ते ११.३० पर्यंत आहे. सकाळी ११ नंतर उन्हाची तीव्रता वाढते. त्यामुळे उशिरापर्यंत शाळेत थांबल्यानंतर मुलांना त्रास होतो.
राज्यात अनेक भागात पत्र्याच्या वर्ग खोल्या असल्यामुळे उन्हामुळे उकाड्याचा त्रास होतो. त्यातच उन्हाळ्यातीव वीजटंचाई, ग्रामीण, आदिवादी भागात दुपारी १२.३० ला मूल्यमापन चाचणी दिल्यानंतर उन्हात चालत घरी पोहोचताना विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होतो.
उष्माघाताची शक्यता वाढते. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवते. सर्व बाबींचा विचार करून मूल्यमापन चाचणीचे आयोजन होणे गरजेचे आहे. भौगोलिक परिस्थिती आणि वाढती उष्णता विचारात घेऊन मूल्यमापन चाचण्या निकोप वातावरणात होण्यासाठी परीक्षा सकाळी घेण्याची मागणी संघटनेने केल्याची माहिती पुणे जिल्हाध्यक्ष शांताराम नेहेरे यांनी दिली.