नवी दिल्ली – इंडिया आघाडीतील घटक पक्ष नसलेल्या बीआरएस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के टी रामा राव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे पुत्र असलेले रामाराव यांनी सांगितले की, ईडी आणि सीबीआय भाजपच्या हातातील “दडपशाहीचे मुख्य साधन” बनले आहेत.राजकीय सूड हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे,असे रामाराव यांनी एक्सवर म्हटले आहे.
बीआरएस पक्षाच्या एमएलसी के कविता यांनाही याच प्रकरणात ईडीने अलिकडेच अटक केली आहे. बीआरएस हा पक्ष इंडिया आघाडीतही नाही पण त्यांचे भाजपबरोबर साटेलोटे असल्याचा आरोप केला जात आहे. त्या पाश्र्वभूमीवर त्यांनी केजरीवालांच्या अटकेचा निषेध करण्यास राजकीय महत्वही दिले जात आहे.