राहू, {भाऊ ठाकूर}- दौंड तालुक्यात अनधिकृत वीज पुरवठ्याला काही ठिकाणी महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्याच पाठिंबा मिळत आहे. अनेक ठिकाणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हप्तेखोरी सुरू केल्या असल्याची चर्चा राहू बेट परिसरामध्ये व्यक्त होत आहे.
नियमानुसार अनेक ग्राहकांनी वीज कनेक्शन घेतले असून एक महिन्याचे वीज बिल न भरल्यास त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. मात्र, शेजारील किंवा आसपास अनधिकृत वीज पुरवठा रात्रंदिवस महावितरणच्या आशीर्वादाने सुरू असल्याच्या घटना पहावयास मिळत आहे.
अनेक सर्वसामान्य नागरिकांना वीज बिले ही सुद्धा वेळेवर मिळत नाहीत तर मिळालेल्या बिलामध्येही अनेक त्रुटी, अवाजवी बिलामुळे वीजबिल भरणा करण्यास अडचणी येतात. केडगावचे कार्यकारी विभागीय अभियंता यांनी स्वतः अनधिकृत वीज वापर करणाऱ्या ठिकाणी एका व्यावसायिक वीज ग्राहकांवर कारवाई केली होती.
गायरानमध्ये अनधिकृतपणे जागा धरत निवास केलेल्या ठिकाणी सर्रासपणे आकडा टाकून वीज वापर सुरू आहे. महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या समक्ष हा वीज पुरवठा सुरू असून याकडे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचे परिस्थिती आहे.
कृषीपंपाच्या बाबतीत देखील अशीच परिस्थिती आहे. वीज चोरीमुळे ट्रान्सफॉर्मर जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीची वीज दिली जाते तसेच दिवसा थ्री फेज विन देत असताना सुद्धा दुरुस्तीच्या नावाखली आठ तासांतील चार- चार तास विनाबंद केली जाते. वास्तविक पाहता दुरुस्तीच्या कामासाठी थ्री फेज वीज बंद केल्यास तितकी विन वाढवून देणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसत नाही.
अनाधिकृतपणे वीज वापर करणाऱ्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकावर आले होत असून याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज प्रामाणिक ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.
कृषीपंप धारकांचे हाल
राहू बेट व परिसरात तापमानामध्ये चांगली वाढ होताना दिसत आहेत. त्यामुळे पिकांना आता पाण्याची गरज भासू लागली आहेत. परंतु प्रामाणिक कृषीपंप धारकांना अडचण येत आहे. एका शेतीच्या ट्रान्सफॉर्मरवर प्रमाणापेक्षा जास्त लोड असल्याने अडचण येत आहेत. वास्तविक पाहता कृषीपंपाच्या ट्रान्सफॉर्मरवर कागदोपत्री योग्य लोड दिसून येत आहे.
परंतु त्याच ट्रान्सफॉर्मरवर अनेक आकडे टाकून वीज चोरली जाते. परंतु त्यामुळे अधिकृत वीज जोड असणाऱ्या ग्राहकांना अडचण येत आहे. लोड करत असल्यामुळे व उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मर जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या आकडे बहाद्दरांना कोठे तरी आळा घळणे गरजेचे आहे. त्यांना कायदेशीर वीज जोड देणे गरजेचे आहे. तरच प्रामाणिक ग्राहकांना त्रास होणार नाही.
महावितरणकडून कृषीपंपासाठी मागेल त्याला कनेक्शन देत आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घेणे गरजेचे आहे. तरी सुद्धा वीज चोरी आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. पुढील काळात वीजचोरी विरुद्ध मोहीम अजून कडक केली जाणार आहे – पप्पू पिसाळ, कनिष्ठ अभियंता, शाखा कर्यालय, पिंपळगाव.