पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदार संघात हॅटट्रीक करण्यासाठी इच्छूक असलेले खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला महायुतीधील घटक पक्षांमधूनच विरोध वाढू लागला आहे. तर बहुतांशी सर्वच राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर मावळ लोकसभा मतदार संघ आहे. परिणामी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारीकरिता उतावळेपणा दिसत आहे.
मावळ लोकसभेतून यावेळचा खासदार कमळाच्या चिन्हावर निवडून आणण्याचा संकल्प मावळ विधानसभेतील भाजपच्या पदाधिकार्यांनी केला आहे. पण तो उमेदवार शिंदे गटाचे श्रीरंग बारणे नको तर मावळमधील भाजपचे बाळा भेगडेच असतील, असे सुतोवाच मावळचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे यांनी केले आहे. तर मी मावळ लोकसभेची निवडणूक लढावी, अशी इच्छा कार्यकर्त्यांची असल्याचे बोलून आपली इच्छादेखील बाळा भेगडेंनी जाहीर केले आहे.
दरम्यान, पक्ष संघटनेत लोकसभा निवडणुकीकरिता बाळा भेगडे यांच्यावर पक्षाने एका मतदार संघाची जबाबदारी सोपविल्याने ते मावळ लोकसभा निवडणूक कशी लढवू शकतात? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सध्यातरी भाजपकडे लोकसभेकरिता उमेदवार असून, तो नसल्यात जमा आहे, हे वास्तव पदाधिकार्यांनी स्विकारावे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी नियुक्तीवरून आमदार सुनील शेळके व खासदार बारणे यांच्यात पडलेली वादाची ठिणगी अनेक दिवस धुमसत होती. यावरून शेळके यांनी बारणे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर यापुर्वीच बाळा भेगडे यांचे तालुक्यात भावी खासदार असे फलक झळकले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढविण्याचा विचार त्यांच्यासाठी नवा नाही.
दरम्यान, महाआघाडीमधील शिवसेनेचे संजोग वाघेरे आपल्या परिने प्रचारात उतरले आहेत.तर महाआघाडीमधील नवा भिडू असलेल्या वंचित बहुजन आघाडीने मावळ लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर मनसेनेदेखील दोन महिन्यांपासूनच मावळातील पक्ष संघटनेकडे लक्ष देण्यास सुरूवात केली असून, वरिष्ठ पदाधिकार्यांच्या उपस्थितीत प्राथमिक बैठक होऊन, त्यामध्ये चाचपणीदेखील झाली आहे. याशिवाय आपच्या पदाधिकार्यांनीदेखील मावळ लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आग्रह धरला आहे.
महाआघाडी, महायुतीचेच घटक पक्ष
मावळ लोकसभा मतदार संघावर दावा सांगणारे बहुतांशी राजकीय पक्ष हे महायुती व महाआघाडीचे घटक पक्ष आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व वंचित बहुजन आघाडी या राजकीय घटक पक्षांचा समावेश आहे. तर मनसे व आपची भूमिका लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्पष्ट होऊ शकेल, अशी राजकीय परिस्थिती आहे.