मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमासाठी मंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्या याच्याकडे नेतृत्व सोपवण्याच्या निर्णयाचे विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी समर्थन केले आहे. पंड्याला कर्णधार बनवल्यामुळे रोहितवरचे दडपण कमी होणार आहे व तो मुक्तहस्ते फलंदाजीचा आनंद घेऊ शकेल, असे गावसकर म्हणाले.
भारतात नुकत्याच झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत कर्णधार असूनही रोहितने ज्या पद्धतीने निर्भिड फलंदाजी केली तशीच आता तो मुंबईचा कर्णधार नसेल तर तशीच फलंदाजी करु शकेल व त्याचा लाभ संघाला सर्वाधिक होणार आहे, असेही गावसकर म्हणाले.
या बदलामुळे रोहितच्या खांद्यावरील कर्णधारपदाचे दडपण कमी होणार आहे. हार्दिक तिसऱ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन जास्त लाभदायक ठरु शकतो. तसेच हे दोघे असे फलंदाज आहेत की जे संघाला जवळपास प्रत्येक सामन्यात २०० पेक्षा जास्त धावा उभारून देऊ शकतात, असेही ते म्हणाले.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हार्दिकला मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सकडून ट्रेडिंग विंडोदरम्यान करारबद्ध केल. आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या लिलावाच्या अवघ्या ४ दिवस आधी मुंबईने हार्दिकची मुंबईचा कर्णधार म्हणून घोषणा केली. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ५ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली या संघाने वर्चस्व गाजवले.