वेळ असेल तर नक्की या, पुराव्यानिशी दाखवून देऊ
इंदापूर – दोन दिवसांपूर्वी विरोधकांनी आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये नीरा-भीमा व कर्मयोगी कारखान्याच्या शेतकर्यांची बिले व कामगारांचे पगार वेळेवर दिले जात नाहीत, असा बिनबुडाचा आरोप केला आहे;
मात्र माझे विरोधकांना आव्हान आहे की त्यांनी कामगारांना व शेतकर्यांना अगोदर विचारावे की तुमची बिले व कामगारांच्या पगारी वेळेवर होतात की नाहीत याची शहानिशा करावी, असे आव्हान नीरा-भीमाचे संचालक राजवर्धन पाटील यांनी विरोधकांना दिले.
पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनेक संस्था काढून तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या संस्थांमुळे तालुक्यात आर्थिक सुबत्ता निर्माण झाली.
तालुक्याचे अर्थकारण या संस्थांवर अवलंबून आहे; मात्र काही विरोधक जाणूनबुजून या संस्था बदनाम करण्याचे कटकारस्थान करत आहेत. त्यांनी हे तात्काळ थांबवावे अन्यथा, सर्व सामान्य जनता, शेतकरी व कर्मचारी त्यांना धडा शिकवेल.
विरोधकांचा समाचार घेताना राजवर्धन म्हणाले, ज्या कोणाला याची पूर्ण माहिती हवी आहे त्यांनी कारखान्यावर वेळ काढून यावे. त्या आरोप करणार्या व्यक्तीला पुराव्यानिशी संपूर्ण माहिती देऊ. विरोधकांनी एक संस्था काढलेली नाही.
ज्यांनी संस्था काढल्या त्या संस्थेला बदनाम करण्याचे काम करू नये. मोकळ्यात बडबड करण्यापेक्षा संस्थेवर या तुम्हाला पूर्ण माहिती देऊ तरीही संस्थेची बदनामी करत असाल तर सर्वसामान्य जनता तुम्हाला योग्य जागा दाखवून देईल.
खोटे आरोप करणारे लोक किती विद्वान आहेत हे तालुक्यासह सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या बुडाखालचा अंधार झाकून ठेवण्यासाठी दुसर्यावर बेछूट आरोप करू नयेत.
कारण, स्वर्गीय शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांची आम्हाला शिकवण आहे म्हणून आम्ही शांत आहोत. अन्यथा जशास तसे उत्तर देण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही असा निर्वाणीचा इशारा राजवर्धन पाटील यांनी दिला आहे.