पुणे – अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर लोकार्पणानिमित्त देशभर भगवे वातावरण निर्माण झाले आहे. ही हिंदू राष्ट्राची नांदीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचूक वेळी घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे राम मंदिराचे स्वप्न साकार होऊ शकले, असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केले.
भाजप महिला मोर्चाच्या वतीने नमो चषक अंतर्गत नमो वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, माजी आमदार जगदीश मुळीक, अंकिता पाटील आदी उपस्थित होते.
जीवनात यशस्वी होण्यासाठी महिलांनी स्वतः साठी वेळ देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून वॉकेथॉनचे कौतुक केले. नमो वॉकेथॉन माध्यमातून महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण या विषयांमध्ये महिला आघाडीचे काम कौतुकास्पद आहे. प्रत्येक आठवड्यात महिलांसाठी अशा विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना प्रेरणा, स्फूर्ती देणे आवश्यक आहे, असे पाटील म्हणाले.
नमो चषक स्पर्धेला पुणे शहरात प्रतिसाद मिळत आहे. आजचे नमो वॉकेथॉन हे त्याचेच प्रतीक आहे, असे घाटे म्हणाले. महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे, संयोजिका प्रियांका शेंडगे शिंदे, गायत्री खडके, भावना शेळके, आरती कोंढरे, खुशी लाटे, कोमल कुटे, उज्वला गौड यांनी संयोजन केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उपमुख्यमंत्र्यांनी गायले श्रीरामावरील गाणे
श्रीराम मंदिर लोकार्पणानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी गाणे लिहिलेले असून, त्याला अजय -अतुल यांनी संगीत दिले आहे. त्यांनी काही कडवी आपण स्वत: आणि देवेंद्र फडणवीस यांनी गायली असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी कार्यक्रमानंतर दिली.