सोलापूर – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान महाराष्ट्राने मणिपूरचा तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि ६९ धावांनी दणदणीत पराभव केला. महाराष्ट्राकडून सिद्धेश वीर व हितेश वळुंज यांनी मणिपूरच्या फलंदाजीची वाताहत केली. महाराष्ट्राच्या पहिल्या डावात दीडशतकी खेळी करणारा अंकित बावणे सामन्याचा मानकरी ठरला.
या सामन्यात मणिपुरने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली होती. त्यांचा पहिला डाव हितेश वळुंज व प्रदीप दाढे यांच्या गोलंदाजीसमोर १३७ धावांवर संपला होता. त्यानंतर महाराष्ट्राने आपल्या पहिल्या डावात ३२० धावा केल्या व मणिपूरवर मोठी आघाडी घेतली होती. त्यात बावणेने दीडशतकी खेळी केली. त्याला साथ देताना सिद्धेश वीर व कर्णधार केदार जाधव यांनी अर्धशतके फटकावली होती. त्यांनंतर शनिवारी मणिपुरचा दुसरा डाव ४ बाद ८५ असा घसरला होता. त्यानंतर रविवारी त्यांनी डाव पुढे सुरु केल्यावर त्यांच्या फलंदाजांना महाराष्ट्राच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही.
त्यांचा दुसरा डाव ११४ धावांवर संपला व महाराष्ट्राने एक डाव आणि ६९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह महाराष्ट्राने यंदाच्या स्पर्धेत विजयी सलामी दिली. महाराष्ट्राकडून सिद्धेश वीरने ४ गडी बाद केले. पहिल्या डावात ५ बळी घेतलेल्या हितेश वळुंजने याही डावात अफलातून गोलंदाजी करताना ३ गडी बाद केले. मणिपुरकडून नितेश सेदाईने २६ तर, जॉन्सन सिंगने २३ धावा केल्या. अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर उभेही राहता आले नाही.
संक्षिप्त धावफलक –
मणिपुर पहिला डाव – सर्वबाद १३७ धावा. महाराष्ट्र पहिला डाव – सर्वबाद ३२० धावा. मणिपुर दुसरा डाव – ५५.२ षटकांत सर्वबाद ११४ धावा. (नितेश सेदाई २६, जॉन्सन सिंग २३, सिद्धेश वीर ४-१०, हितेश वळुंज ३-३१).