कोलकाता – दुष्ट शक्तींच्या विरोधात लढण्याचा निर्धार करा आणि लोकशाही अधिकाराचे रक्षण करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहा असा सल्ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांंना दिला आहे. तृणमुल कॉंग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमीत्त बोलताना त्यांनी हा संदेश दिला आहे.
१ जानेवारी १९९८ रोजी तृणमुल कॉंग्रेस या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्या म्हणाल्या की, मातृभूमीचा सन्मान, राज्याचे हित व लोकशाहीच्या हिताची जपणूक करणे अशा ध्येयांसाठीच या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
एका सोशल मिडीया पोस्टवर त्यांनी म्हटले आहे की, आमच्या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आणि समर्थकाच्या समर्पण आणि त्यागाचा मी नम्रपणे आदर करते. तृणमुल कॉंग्रेस हा आपल्या सगळ्यांचाचा एक परिवार आहे असेही त्यांनी म्हटले आहे. यापुढील काळात आपल्याला देशातील सामान्य जनतेच्या हितासाठी लढा द्यावा लागणार असून त्या लढ्यात टिकून राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
“तुमच्या अखंड पाठिंब्याच्या बळावरच आम्ही या महान लोकशाही देशात सर्वांसाठी लढत राहू. आम्ही कोणत्याही दुष्ट शक्तीला शरण जाणार नाही. सर्व दहशतवादाला झुगारून आम्ही आमच्या देशातील सामान्य लोकांसाठी आमचा आयुष्यभर संघर्ष सुरू ठेवू, असेही त्यांनी म्हटले आहे.