नवी दिल्ली – अपघातात जखमी झालेला भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत पुढील वर्षी होत असलेल्या आयपीएल स्पर्धेद्वारे क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असा विश्वास आयपीएल स्पर्धेतील प्रमुख संघ दिल्ली कॅपिटल्सच्या संघ व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. यंदाच्या वर्षी पंतकडेच नेतृत्व देण्यात आले होते. मात्र, अपघातामुळे त्याला या स्पर्धेला मुकावे लागले होते. आता मात्र, तो लवकरच तंदरुस्त ठरेल असेही त्याच्या संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो दिल्लीला आपल्या घरी परतत असताना त्याच्या कारला अपघात झाला होता. पंत स्वतःच गाडी चालवत होता. वेगावर नियंत्रण राखता आले नाही व त्याच्या कारला अपघात झाला. त्यात पंत गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर विविध शस्त्रक्रीयाही करण्यात आल्या. त्यानंतर त्याला बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतही (एनसीए) पाठवण्यात आले होते. तेथे त्याच्या फिटनेसबाबत योजनाही अंमलात आणल्या गेल्या व त्याला जीममध्ये तसेच नेटमध्ये काही काळ सरावहीकरता आला. हळूहळू त्याच्या तंदुरुस्तीत सुधारणा होत आहे.
पुढील आयपीएल स्पर्धा मार्च व एप्रिल या कालावधीत होत असून त्यापूर्वी तो मॅचफिट असल्याचे सिद्ध होइल व दिल्ली संघात परतेल. पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व डेविड वॉर्नरकडे सोपवण्यात आले होते. मात्र, यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दिल्ली संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहीला. या स्पर्धेत दिल्लीला १४ पैकी केवळ ५ सामन्यात विजय मिळवता आला. तर ९ सामने गमवावे लागले. त्यामुळे पंत टर मॅचफिट ठरला तर पुढील वर्षी तोच दिल्ली संघाचे नेतृत्व करेल.
World Cricket : दोन वेगवेगळ्या घटनेनं जागतिक क्रिकेटला गैरवर्तनाचे गालबोट…
पुढील स्पर्धेपूर्वी स्पर्धेतील सगळ्या संघांनी आपल्या संघातून काही खेळाडूंना मुक्त केले तर काही खेळाडूंना कायम राखले. दिल्लीने पंतला कायम राखले आहे. आता येत्या १९ डिसेंबरला दुबईत पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठीचा लिलाव होणार आहे. मात्र, दिल्लीने मोठी रक्कम देत आणखी काही खेळाडूंना करारबद्ध केले तरीही नेतृत्व मात्र, पंतकडेच राहणार आहे, असेही दिल्ली संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय पुनरागमनही लवकरच
पंतने पुढील वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत भाग घेतला तर तो मॅचफिट असल्याचे सिद्ध होणार आहे. त्यामुळे तो भारतीय संघातही पुनरागमन करु शकणार आहे. बीसीसीआयच्या नियमानूसार एखादा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेला असेल तर तो फिट झाल्यावरसंघात पुनरागमनासाठी त्यालाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे पंतने आयपीएल स्पर्धेत आपली तंदुरुस्ती सिद्ध केली तर त्याच्यासाठी भारतीय संघाची कवाडे खुली होतील. अर्थात त्याच्या पुनरागमनामुळे यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा राहील. इशान किशन, लोकेश राहुल, तिलक वर्मा व पंत यांच्यापैकी कोणाची निवड करायची याचे दडपण निवड समितीवर येणार आहे.