नगर – शासनाने 31 ऑक्टोबरची अधिसूचना काढून राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्ती असेल तर जुन्या पेन्शन योजनेचा लाभ नाकारलेला आहे. याचा निषेध म्हणून राज्यभरातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिवाळी “काळा दिवस’ म्हणून पाळला. यावेळी राज्यभरातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आणि राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेचे राज्यसचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी दिली.
वस्तुतः पूर्वलक्षी प्रभावाने शासन निर्णय जाहीर करताना कर्मचारीहित जपणे आवश्यक होते; मात्र कर्मचाऱ्यांवर अक्षम्य अन्याय झाल्याचा आरोप सर्व नवीन पेन्शनधारक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. निवृत्तीनंतर उतारवयात निरोगी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी वरील निर्णय अत्यंत घातक आहे. किंबहुना, कर्मचारी निवृत्त झाल्यावर जगूच नये, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. यासाठी शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्याचे धाडस गतिमान सरकार दाखवेल काय, असा सवाल शिक्षक नेते सुनिल गाडगे व जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांनी शासनाला केला आहे.
तसेच सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी विनाविलंब आदेश निर्गमित करावे, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा शिक्षक नेते सुनिल गाडगे यांनी दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, आशा मगर, सोमनाथ बोंतले, आबासाहेब लोंढे, विजय कराळे, मोहंमद समी शेख, रामराव काळे आदी उपस्थित होते.
====================