जालना – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 15 वा दिवस आहे. आज सकाळी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासोबत शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे देखील उपस्थित होते. यावेळी मनोज जरांगे यांना संभाजी भिडे यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकणाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले.
काय म्हणाले संभाजी भिडे?
“मराठा समाजाला जसं पाहिजे तसं आरक्षण मिळालंच पाहिजे या निश्चयानं आम्ही तुमच्या पाठिशी उभे आहोत. तुम्ही जे करताय ते योग्य आहे. मागच्या अनेक दिवसात एवढ्या चांगल्या नेतृत्वाचं सरकार राज्यात नव्हतं. ते आता आलेलं आहे. ही माणसं शब्द पाळतील, यावर माझा विश्वास आहे. आत्ता सत्तेत असणारे एकनाथ शिंदे अजिबात लबाडी करत नाहीत. देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत. अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले, तरी काळजी करणारा माणूस आहे. माझं असं मत आहे की हे आंदोलन जिवाच्या आकांतानं तुम्ही चालवत आहात. तुमच्या तपश्चर्येला यश मिळणार आहे,” असं आश्वासन यावेळी संभाजी भिडेंनी मनोज जरांगेंना दिले.
तुमच्या बाजूने ही लढाई यशस्वी होणार आहे. पण तुम्ही हे उपोषण थांबवावं. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही उपोषण थांबवा, लढा नाही, अशी विनंती संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांना केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे धुरंधर आहेत. देवेंद्र फडणवीस बेईमानी करणार नाहीत, असं म्हणत संभाजी भिडे यांनी तिघांचे कौतुकही केले.
संभाजी भिडे यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांनीही प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “सगळ्या महाराष्ट्राचा एकच उद्देश आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. भिडे गुरुजी आंदोलनात जोडले गेल्याने आम्हाला बळ मिळालं आहे. पण भावना महत्त्वाची नाही आमच्या समाजासाठी आम्हाला आरक्षण महत्त्वाचं आहे ,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.