औरंगाबाद : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. त्यातच मराठ्यांना ओबीसींच्या आरक्षणातून आरक्षण देण्याची मागणी देखील करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत होते. हे सर्व सुरु असताना आता दुसरीकडे ओबीसी समाजाने देखील आंदोलनाचा शंख फुंकला आहे. कारण ओबीसी समाज आता आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. ओबीसी समन्वय समितीने यासाठी औरंगाबादमध्ये अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला.
औरंगाबादमध्ये उद्या म्हणजेच 13 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता क्रांतीचौकात हे आंदोलन होणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. या संदर्भातील आयोजन बैठक नुकतीच पार पडली. यावेळी या बैठकीत अन्नत्याग आंदोलनाचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. ओबीसी समन्वय समितीच्या वतीने माजी आमदार नारायणराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीमधील समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली.
बैठकीत ओबीसींच्या विविध मागण्या आणि ओबीसींवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात चर्चा झाली. या चर्चेदरम्यान जनआंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली असून उद्या धरणे आंदोलन, निदर्शने करून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या अन्नत्याग आंदोलनात ओबीसींनी सहभागी होण्याचे आवाहन देखील समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहेत.
ओबीसी समन्वय समितीच्या ‘या’ आहेत मागण्या…
* मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधून ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये.
* सर्व जातीची जातनिहाय जन- गणना त्वरित करावी
* आजतागायत मराठा समाजाला कुणबी (ओबीसी) म्हणून दिलेली जातींची प्रमाणपत्रे रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
* ओबीसी, (व्हिजेएनटी, एसबीसी) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी
* ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. ती त्वरित चालू करावी
* सरकारी उद्योगांचे खासगीकरण थांबून सरकारी नोकऱ्यांच्या खासगीकरणाचा अध्यादेश तत्काळ रद्द करण्यात यावा, अशा मागण्या समन्वय समितीच्या आहेत.