मुंबई : राज्यात पावसाने चांगलीच दडी मारली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्याच्या जवळपास सर्व भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. अंदाजाप्रमाणे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मात्र त्यानंतर पावसाचा जोर पुन्हा ओसरला.
राज्यात पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनला पोषक स्थिती नसल्यामुळे पुढचे किमान तीन दिवस तरी राज्यात पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शुक्रवारी कोकणासह राज्याच्या घाटमाथ्यावरील परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तर बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टाही वायव्येला सरकला आहे. महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असले तरीही काही जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस अद्याप झाला नाही. राज्यात पाऊस कमी झाल्यामुळे शेतीच्या कामांचा वेग मंदावला आहे.
राज्यात पावसाची ही परिस्थिती असताना तिकडे हिमाचल, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात मात्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरीही या भागांमध्ये दरडी कोसळण्याचे सत्र सध्या सुरुच आहे. मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासन आपल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करत आहे.