मुंबई : देशातील लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार आहे. मात्र असे असले तरी राज्यातइतर पक्ष म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांसारखे काही पक्ष आहेत जे महायुतीत किंवा महाविकास आघाडीत सहभागी झालेले नाहीत. राष्ट्रीय समाज पक्ष हा त्यापैकीच एक आहे. पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर सध्या पक्षबांधणीसाठी जनस्वराज्य यात्रेनिमित्त राज्यभर फरत आहेत. त्यातच त्यांनी एकट्याने निवडणूक लढण्याची घोषणा दिली आहे.
यात्रेदरम्यान महादेव जानकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी,” हे मोठे पक्ष काय करतात? मोठा मासा लहान माशाला खातो. पण लहान माश्याने लक्षात ठेवलं पाहिजे की आता आपण मोठं व्हायचं आहे. म्हणून रासपने ठरवलंय आता आपण मोठं व्हायचं. सध्या देशात भाजपा आणि काँग्रेस हे दोन मोठे पक्ष आहेत. त्यांच्याबद्दल आपण आत्ताच टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रात रासपला सध्या चांगली संधी आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे राज्यात रासपसाठी चांगलं वातावरण आहे.” असे म्हणत कार्यकर्त्यांना विश्वास दिला.
जानकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना,”आपला पक्ष मोठा झाल्याशिवाय आपल्याला ही मंडळी (भाजपा) जवळ ठेवणार नाही. भाजपाला जेव्हा माझी गरज होती, राजू शेट्टी, रामदास आठवले, विनायक मेटे यांची गरज होती, तेव्हा आम्ही एकत्र आलो. आता त्यांना वाटत असेल की आपल्याला काही यांची गरज नाही. त्यामुळे आपण त्यांच्या मागे लागण्यात अर्थ नाही. त्यामुळे आपण आपली ताकद निर्माण केली पाहिजे. म्हणून जिथे चांगलं आहे त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे.असे त्यांनी यावेळी म्हटले.