मुंंबई – देशभरात टोमॅटोच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. साधारण 200 ते 250 प्रतिकिलो दराने टोमॅटो विकले जात होते. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या ताटातून टोमॅटो गायब झाला होता. मात्र टोमॅटोचे दर कमी झाल्यानंतर आता कांद्याच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेच आता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 31 डिसेंबरपर्यंत 40 टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यासोबतच विरोधी पक्ष केंद्र सरकारवर टीका करत आहे. ठाकरे गटाच्या सामना अग्रलेखातून देखील केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. मोदी सरकारचे खायचे दात वेगळे असल्याची टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
काय लिहिले ‘सामना’ अग्रलेखात ?
“टोमॅटोने गेल्या महिन्यात 200 रुपयांचा आकडा पार केला होता. उद्या कांद्याने ही त्याच्याच पावलावर पाऊल टाकले तर आधीच महागाईत होरपळणारी जनता तोंडावर आलेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत केंद्रातील सत्तापक्षावर ‘मतबंदी’ची कुऱ्हाड चालवेल . ही मोदी सरकारची खरी धास्ती आणि भीती आहे . कांद्याचे निर्यात शुल्क तब्बल 40 टक्के वाढविण्याचा निर्णय तडकाफडकी याच भीतीतून घेतला गेला आहे . दरवाढ नियंत्रण आणि जनतेचे हित वगैरे दाखवायचे दात आहेत. सामान्य कांदा उत्पादकाच्या पोटावर मारलेली निर्यात शुल्क वृद्धीची लाथ हे मोदी सरकारचे ‘ खायचे दात‘ आहेत. निर्णयत्रस्त बळीराजा आणि महागाईग्रस्त जनता उद्याच्या निवडणुकीत सत्तापक्षाचे हे दात त्यांच्याच घशात घातल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा सामना अग्रलेखातून देण्यात आला आहे.
“शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देणारे मोदी सरकार प्रत्यक्षात बळीराजाला मिळणारे उत्पन्न देखील मिळू नये असाच कारभार करीत आहे. या सरकारचे धोरण ना शेतकरी हिताचे आहे ना ग्राहकांच्या फायद्याचे. त्यातही शेतमालाबाबतचे निर्णय एवढया उफराटय़ा पद्धतीने घेतले जात आहेत की, जास्तीचे चार पैसेही शेतकऱ्यांच्या खिशात पडू नयेत. कांदा उत्पादकांना तर हा अनुभव नेहमीचाच झाला आहे. आतादेखील कांद्याच्या निर्यात शुल्कात थेट 40 टक्क्यांची वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय शेतकऱ्याच्या मुळावरच आला आहे. कांद्याचे चढे दर नियंत्रणात यावेत म्हणून निर्यात शुल्क वाढविले, असा बचाव सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र त्यामुळे कांदा उत्पादकाच्या जास्तीच्या उत्पन्नाला चाळणी लागली त्याचे काय? सरकारने निर्यात शुल्क वाढवल्यावर लगेच कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल तब्बल 200 रुपयांची घट झाली.
कांद्याचा कमाल भाव 2500 रुपयांवरून 2300 रुपयांवर घसरला. पुढे हा दर आणखी घसरणार हे निश्चित आहे. कारण निर्यात शुल्क वाढविल्याने निर्यातीत घट होईल, देशातील बाजारात कांद्याची उपलब्धता वाढेल आणि दर पडतील. त्यामुळे ग्राहकांना कांदा रडविणार नाही हे खरे असले तरी सामान्य कांदा उत्पादकाच्या डोळय़ांतून ज्या अश्रुधारा वाहत आहेत त्या कोणी पुसायच्या? ग्राहकांच्या खिशातून पैसे काढा आणि ते बळीराजाच्या खिशात टाका, असे कोणी म्हणणार नाही. शेतकरी आणि ग्राहक यांच्या लाभहानीचा ‘तराजू’ जास्तीत जास्त समतोल कसा राहील ही जबाबदारी आणि कर्तव्य केंद्र सरकारनेच पार पाडायचे असते. मात्र मोदी सरकारचे घोडे नेहमी येथेच पेंड खात आले आहे.
कांद्याचे दर पडतात तेव्हा शेतकऱ्याला तो फेकून द्यावा लागतो किंवा कवडीमोल दरात विकावा लागतो. दर वाढलेच तर केंद्रातील मायबाप सरकारच दर नियंत्रण धोरणाच्या कुऱ्हाडीचा घाव घालते. निर्यातीतून मिळणारे जास्तीचे पैसे शेतकऱ्याला मिळू देत नाही. कांद्याचे निर्यात शुल्क वाढविण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाने हेच होणार आहे. या निर्णयाचा फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांनाही बसला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद पाडण्याचे इशारे शेतकऱ्यांनी दिले आहेत ते चुकीचे कसे म्हणता येतील? शेतकऱ्याच्या खिशात कधीतरी जास्त पैसे पडण्याची वेळ आली की सरकार एकतर निर्यात शुल्क वाढविते, नाही तर निर्यातबंदीचा दांडपट्टा फिरविते. आताही कांद्याच्या निर्यातीतून मिळू शकणाऱ्या पैशांवर शेतकऱ्याला पाणी सोडावे लागणार आहे. पुन्हा मोदी सरकारने हा निर्णय अचानक जाहीर केला. त्यात स्पष्टताही नाही. त्यामुळे आधीच निर्यातीसाठी पाठविलेला हजारो टन कांदा सीमेवर आणि बंदरांवर अडकून पडला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत हिंदुस्थानी कांद्याची निर्यात जुलैपर्यंत तब्बल 63 टक्के वाढली आहे. ती आणखीही वाढली असती, मात्र सरकारच्या निर्यात शुल्क वृद्धीने या निर्यातीलाच ब्रेक लागला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकाचे वाढीव उत्पन्न तर बुडालेच, परंतु देशांतर्गत भाव कोसळल्यानंतर त्याला दुहेरी फटका सहन करावा लागणार आहे. या देशातील कांदा उत्पादक नेहमीच अस्मानी-सुलतानीच्या चरकात पिळून निघत असतो. कांद्याने राज्यकर्त्यांनाही रडविले आहे. प्रसंगी सत्तेतूनही घालविले आहे. तरीही कांदा उत्पादकाला रडविण्याचे, बळीराजाला गृहीत धरण्याचेच धाडस विद्यमान सरकार करीत आहे,” असे ‘सामना’ अग्रलेखात म्हंटले आहे.