पुणे – उड्डाणपुलाच्या कामामुळे अरुंद झालेल्या सिंहगड रस्त्यावर नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. जनता वसाहत ते वडगाव पूल आणि धायरी फाटा मार्गावर मोकाट श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. हे श्वान अंगावर येत असल्याने दुचाकीस्वार दडपणाखाली वाहन चालवत आहेत.
सध्या पावसामुळे सर्वच रस्ते निसरडे झाले आहेत. त्यात श्वान अचानक अंगावर येत असून, रात्रीच्यावेळी वाहन चालकांची धांदल उडत आहे. शिवाय, काही अतिहौशी नागरिक रात्रीच्यावेळी या प्राण्यांसाठी अन्न घेऊन येतात. या श्वानांना याची सवय झाल्याने टोळकेच्या टोळके रस्त्यालगत ठाण मांडून बसलेले दिसून येते. भूतदयेच्या नावे हे नागरिक श्वानांना खाऊ घालत असले, तरी त्यामुळे अन्य नागरिक अडचणीत आले आहेत. विशेषत: रात्रीच्या सुमारास पोलिसांचे गस्ती पथम या मार्गांवरून फिरत असते. पण, ते देखील या अतिहौशी नागरिकांना आवर घालत नाहीत. तर, या श्वानांना पकडण्याची जबाबदारी पालिकेचीच आहे का? अशी शंका पुणेकर उपस्थित करत आहेत.
- निसरड्या रस्त्यांवर दुचाकीचे अपघात
- श्वान अचानक अंगावर येतात
श्वान दिसतच नाहीत
सिंहगड रस्त्यावर बहुतांश ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे पथदिवे काढण्यात आले आहेत. तर, सध्या संततधार पाऊस असल्याने दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे अंधाराच्या वेळेत हे श्वान सहजासहजी दिसून येत नाहीत. पण, अचानकपणे वाहनचालकांवर धावून जात आहेत. या अचानक उद्भवणाऱ्या स्थितीमुळे गोंधळ निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढतो आहे.