छत्रपती संभाजीनगर : घरची परिस्थिती जेमतेम…डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवलेलं..संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आईवर होती..तरीही या बिकट परिस्थितीत न डगमगता सिल्लोड तालुक्यातील छोट्याशा गावातून एका तरुणाने आपल्या वडिलांचे अखेरचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास मनी बाळगला आणि तो ध्यास तडीस नेला. भागवत तायडे असे या तरुणाचे नाव आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दुय्यम सेवा परीक्षेत उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला भागवतने गवसणी घातली आहे.
सिल्लोड तालुक्यातील डिग्रस या छोट्या गावातील भागवत तायडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुलाने वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याने कुटुंबातील प्रत्येकाला आनंद झाला आहे.
आज मुलगा पीएसआय झाल्याने आयुष्य सार्थकी झाल्याची भावना भागवत यांची आई सुरेखा तायडे यांनी व्यक्त करत असताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
कोरडवाहू शेती असल्याने घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्यातच वडिलांचे डोक्यावरचे छत्र हरपले त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचीजबाबदारी आईच्या खांद्यावर आली होती. घरची परिस्थिती बिकट असल्याने भागवत तायडे याचे शालेय शिक्षण हे मामाच्या गावाला बुलडाणा जिल्ह्यातील माळविहिर याठिकाणी तर १२ वी चे शिक्षणही भारत ज्युनियर कॉलेज बुलडाणा जिल्ह्यात झाले. तर पदवीचे शिक्षण हे धावडा येथून पूर्ण केले आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झालो. २०१८ मध्ये क्लास केले नंतर करोना काळ सुरू झाल्यानंतर स्लेफ स्टडी सुरू केली. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना सगळ्यांप्रमाणे मलाही माझ्या भविष्याची चिंता सतावत होती त्यावेळी माझी आई आणि भावांनी मला खूप मानसिक आधार दिला. त्यांच्या मदतीशिवाय हे सर्व अशक्य होते अशी प्रतिक्रिया भागवत तायडे यांनी दिली.
वडिलांची इच्छा झाली पूर्ण
” मी पोलिस व्हावं अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. आज ते सोबत नाही तरी त्यांची इच्छा पूर्ण केल्याचा मनस्वी आनंद आहे.
12 वी मध्ये असताना वडीलांचे निधन झाले. त्यांची खूप इच्छा होती ‘मी पोलीस व्हावं’ त्याचवेळी तेव्हा कुठेतरी ती गोष्ट मनावर कोरली. तेव्हाच ठरवलं होतं पीएसआय व्हायचं. तीच माझी ताकत म्हणून वापरली व येणाऱ्या समोरील परीक्षेना दुपटीने सामोरे गेलो आणि त्यात मला आज यश मिळाले. “ भागवत तायडे