पुणे -‘माझे पप्पा कुठे आहेत. मला त्यांना भेटायचे आहे’, असे सातत्याने आईला विचारणाऱ्या चार वर्षांच्या निषादला अखेर त्याच्या वडिलांना भेटता येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो वडिलांना भेटलेला नाही. त्याच्या वडिलांनी देखील त्याला भेटण्यास रस दाखवला नाही. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर येथील कौटुंबिक न्यायालयाने वडिलांना त्यांच्या मुलाची भेट घेण्याचा आदेश दिला आहे.
वडिलांना भेटण्याचा मुलाला पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मुलाची इच्छा असेल तेव्हा त्याने सुनावणीच्या दिवशी संध्याकाळी चार ते सहा या वेळेत न्यायालयात आपल्या वडिलांना भेटावे. वडिलांनी त्या वेळेत न्यायालयात हजर राहावे. तसेच भेटीदरम्यान आई किंवा वडिलांनी कोणत्याही प्रकारचा वाद करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. निषादचे वडील रमेश आणि सविता (नावे बदललेली) हे दोघेही आयटीत कामाला आहेत. वैचारिक मतभेद आणि दोघांच्या उत्पन्नात असलेल्या तफावतीमुळे त्यांच्यात वाद सुरू आहेत. त्यामुळे रमेश यांनी पत्नीपासून घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
भांडणामुळे दोघेही वेगळे राहत असून रमेश हे गेल्या तीन वर्षांपासून मुलाला भेटलेले नाहीत. त्यामुळे निषादने आईला माझे पप्पा कुठे आहेत, मला त्यांना भेटायचे आहे, असा हट्ट वारंवार केला. मात्र, रमेश यांनी या काळात मुलाची भेट घेतली नाही. त्यामुळे त्यांनी मुलाची भेट घ्यावी यासाठी सविता यांनी ऍड. रोहित माळी यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला. हा अर्ज मान्य करीत न्यायालयाने रमेश यांना मुलाला ठरलेल्या वेळेत भेटावे, असा आदेश दिला आहे.
मुलाच्या भेटीच्या वेळी वाद करायच नाही
पत्नी भांडकुदळ स्वभावाची आहे. मुलाच्या भेटीवेळी पत्नी जुन्या भांडणावरून पुन्हा वाद करेल. त्या वादातून माझ्यावर खोट्या तक्रारी दाखल केल्या जातील. भेटीचा अर्ज करून पत्नी घटस्फोटाचा दावा लांबविण्याचा प्रयत्न करीत आहे, असे म्हणणे पतीने न्यायालयात दाखल केले आहे. पत्नीच्या अर्जावर दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने सविता यांना मुलाच्या भेटीवेळी पतीबरोबर वाद करायचा नाही. तसेच मुलाची इच्छा असेल तरच त्याला भेटू द्यायचे, असे आदेशात नमूद केले आहे.
आई मुलांना भेटू देत नाही म्हणून वडील न्यायालयात गेल्याची अनेक प्रकरणे आहेत. मात्र, या दाव्यात उलटे घडले आहे. मुलाला भेटावे म्हणून आईने न्यायालयात धाव घेतली आहे. मुलांचा विचार करीत पत्नी सर्व वाद विसरून पुन्हा संसार करण्यास तयार होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे मुलाला भेटल्यानंतर पतीचा विचार बदलेन या भावनेतून पत्नी हा अर्ज केला होता. मात्र, अर्ज मंजूर झाल्यानंतरही वडिलांनी भेटायची तयारी दाखवली नाही. वडिलांचा सहवास लाभणे हा मुलाचा हक्क आहे, असा युक्तिवाद या दाव्यात करण्यात आला होता, असे अर्जदार पत्नीचे वकील ऍड. रोहित माळी म्हणाले.