आमदार मोहिते पाटील : महायुतीमुळे झाले शक्य
राजगुरूनगर – माजी खासदार शिवराजीराव आढळराव पाटील (दादा)आणि माझ्यात एकमेकांवर टीका टिपण्णी आरोप प्रत्यारोप सुरू होते. आमचे दोघांचे खूप दिवस चालले होते माझ्या प्रतिक्रियेवर आढळराव प्रतिक्रिया देत होते त्यांचा प्रतिक्रियेवर मी प्रतिकिया देत असे मात्र आता महायुतीचे सरकार आल्याने खूप दिवसांपासून चाललेली राजकीय जुगलबंदी आता बंद होणार आहे. खेड तालुक्याच्या विकासासाठी सर्वानी एकत्र येऊन आपले योगदान दयावे असे आवाहन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (अण्णा) यांनी राजगुरूनगर येथे केले.
राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्याचे प्रांत कार्यालय ते सातकरस्थळ कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी सदस्य अरुण चांभारे, मंगल चांभारे, बाबा राक्षे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, बाजार समितीचे माजी सभापती विनायक घुमटकर, शांताराम चव्हाण, अशोक राक्षे, शहर अध्यक्ष सुभाष होले, वैभव घुमटकर, सागर सातकर, नितिन गुरव, संतोष भांगे, जयसिंग दरेकर, डॉ. पूनम चिखलीकर, आशा तांबे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मोहिते म्हणाले की, राजगुरूनगर शहरातून जाणारा वाडा रस्ता संपूर्ण कॉंक्रीटीकरण केला जाणार आहे. याबरोबरच पावसाचे पाणी वाहून नेणारी गटार योजना करून पावसाचे पाणी या गटारातून वाहून जाण्यासाठी गटार करणे गरजेचे आहे कारण गटार नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येते त्यामुळे शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली येतात त्याचा त्रास सर्वांना होतो त्यामुळे पावसाळी गटारासाठी निधी उपलब्ध केला जाईल. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. राजगुरुनगर शहर राहण्यासाठी योग्य असल्याने या शहराचा विकास साधला जाईल विकासाच्या दृष्टीने सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रशासकीय इमारत राजगुरूनगरालाच
शहरातील सर्व कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न आहेत.जिल्हा न्यायालयाचा विस्तार वाढविण्यात येणार आहे. सर्व कार्यालये एकत्र आणून सुसज्ज प्रशासकीय इमारत बांधली जाणार आहे. अजित पवार यांच्याकडे सूत्र आली आहेत, त्यामुळे ही इमारत शहराबाहेर जाणार नाही यासाठी प्रयत्न होतील. माजी खासदार आढळराव पाटील यांनी सुचवलेली महामार्गावरील जागा योग्य नाही. म्हणून व्यापार, व्यवसाय आणि नागरिकांची पायपीट हे मुद्दे लक्षात घेता प्रशासकीय इमारत शहरात उभी करणार.
तिन्ही शहरांचा आराखडा लवकरच
चाकण आळंदी आणि राजगुरूनगर या तिन्ही शहरांचा आराखडा लवकरच बनविण्यात येणार आहे. या तिन्ही शहरांसाठी महानगरपालिका करण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जातील. जेव्हा महानगरपालिका होईल त्यावेळी या तीनही शहरांचा व परिसराचा सर्वांगीण विकास होणार आहे.चाकण आळंदी व राजगुरूनगर शहरात मिळून 10 लाखा पेक्षा जास्त लोकसंख्या झाली आहे. या तीनही शहरांसाठी प्लॅनिंग करून तीनही शहरे राज्यात सर्व सोयीयुक्त राहतील, असा प्रयत्न आहे, असे दिलीप मोहिते पाटील यांनी यावेळी सांगितले.
अजित पवार सक्षम नेतृत्व
खेड तालुक्यात माझ्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार मागे आहेत. राज्यातील खेड तालुका असा आहे की सर्व कार्यकर्ते अजित पवार यांच्या मागे ठाम राहिले. अजित पवार हे सक्षम नेतृत्व असल्याने सर्वानी त्यांना राष्ट्रीय नेतृत्वाचा दर्जा दिली आहे. एकसंघ असलेल्या तालुक्याला अजित पवारांनी न्याय द्यावा. जे काय होईल ते अजित पवार करतील ही भूमिका आहे ती केव्हाही बदलणार नाही. स्पष्ट बोलताना मला त्रास झाला मात्र तालुक्याचा फायदा झाला आहे.असे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.