मुंबई – राज्यात राजकीय महाभूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करत शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह 9 नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. एकीकडे या राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे मात्र देशात भाजीपाल्याच्या दरात वाढ होत आहे. देशातील या वाढत्या महागाईवरून शिवसेनेच्या (ठाकरे गट) सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे.
काय लिहिले सामना अग्रलेखात ?
महागाईवरून यूपीए सरकारच्या नावाने ठणाणा करीत मोदी सरकार 2014 मध्ये सत्तेवर आले. मागील नऊ वर्षे सलग त्यांचीच केंद्रात सत्ता आहे, पण महागाई आणि दरवाढीबाबत स्थिती काय आहे? दरवाढ आणि महागाई बिळात लपून बसली आहे काय? वास्तव हेच आहे की, मोदी राजवटीतही ना दरवाढ थांबली आहे, ना महागाई लपून बसली आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून सोने-चांदी आणि चैनीच्या गोष्टींपर्यंत सगळय़ांचेच भाव आकाशाला भिडले आहेत. दैनंदिन जीवनातील भाजीपाला, फळफळावळ यांचेही दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. टोमॅटोने तर कहरच केला आहे. किरकोळ बाजारातील टोमॅटोचे दर प्रतिकिलो 120 ते 150 रुपये एवढे वाढले आहेत. अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या वापरावर आधीच महागाईमुळे निर्बंध आले आहेत. त्यात आता टोमॅटोचीही भर पडली आहे.
मोदी राजवटीत तरी दुसरे काय घडत आहे? नऊ वर्षांच्या सत्ताकाळातील निर्णयांचे ढोल तुम्ही सर्वत्र पिटत आहात. मग या नऊ वर्षांनंतरही ‘महंगाई डायन’ सामान्यांच्या मानगुटीवरून उतरण्याचे नाव का घेताना दिसत नाही? नऊ वर्षांनंतरही तुमचे सरकार दरवाढ आणि महागाईचीच ‘डिलिव्हरी’ का देत आहे? पेट्रोल-डिझेलचे दर ‘परवडले’ एवढी टोमॅटोची भाववाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरापुढे पेट्रोल स्वस्त, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरील मिम्स, रील्स, व्हॉटस्ऍप मेसेज यावर दिसत आहे. ताटात नसलेल्या टोमॅटोचे दुःख करायचे की ‘स्क्रीन’वर दिसणाऱ्या ‘आभासी’ टोमॅटोकडे पाहत ते दुःख विसरण्याचा प्रयत्न करायचा? अशा कात्रीत सामान्य माणूस सापडला आहे. टोमॅटो हीदेखील चोरीची ‘चीज’वस्तू झाली आहे. कर्नाटकातील हसन जिल्हय़ात शेतातील अडीच लाख किमतीच्या टोमॅटो पिकावर ‘दरोडा’ टाकण्यात आल्याची तक्रार तेथील पोलिसांत दाखल झाली आहे.
मध्यंतरी कांदा हा असाच चोरण्याची वस्तू झाला होता. सध्या भाजीपाल्यापासून कडधान्यांपर्यंत अनेकांनी दराचे शतक गाठले आहे. कोथिंबीर, आले, मिरची, वाटाणे यांनी त्रिशतकी मजल मारली आहे. लसूणही त्यात मागे नाही. त्यात टोमॅटोने प्रतिकिलो 150 रुपयांचा पल्ला गाठला आहे. तामीळनाडूमध्ये टोमॅटो रेशन दुकानात पोहोचला आहे. नऊ वर्षांपूर्वी केंद्रातील सत्तेत बसलेले मोदी सरकार काय करीत आहे? भाजीपाल्याच्या दराने ‘त्रिशतक’ गाठले आहे, टोमॅटो भडकला आहे, जनता ‘लालबुंद’ झाली आहे. तिकडे मणिपूर पेटलेलेच आहे. मोदी सरकार मात्र नेहमीप्रमाणे शांत आणि ढिम्म आहे. नऊ वर्षांच्या सत्ताकाळाचे ढोल पिटत आहे, फोडाफोडीच्या राजकारणात दंग आहे. महागाईच्या वणव्याची आणि त्यात होरपळणाऱ्या जनतेची या सरकारला जाणीव आहे काय? असा सवाल सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.