पुणे – शहरातील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी खासगी क्लासशी सलंग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातच प्रवेश घेण्याला पसंती दिली आहे. यामुळे मोठ्या व नामांकित महाविद्यालयांऐवजी छोट्या महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे गुणवंत विद्यार्थ्यांचाही ओढा अधिक असल्याचे आढळून येऊ लागले आहे. यामुळे यंदाही बहुसंख्य महाविद्यालये ओस पडणार असून खासगी क्लासची मात्र चलती वाढणारच आहे.
90 टक्क्याहून अधिक गुण मिळविणारे विद्यार्थीही मोठ्या महाविद्यालयाऐवजी छोट्याशा महाविद्यालयात प्रवेश घेण्याला प्राधान्य देण्यात येवू लागले आहेत. विद्यार्थ्यांचा यंदाही कला, वाणिज्यपेक्षा विज्ञान शाखेकडे अधिक कल आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीकोनातून जेईई, नीट, सीईटी या विविध प्रवेश परीक्षांचा अभ्यास करण्यात विद्यार्थी मग्न असतात. या परीक्षांसाठी शहरात बहुसंख्य खासगी क्लासचालकांनी आपली दुकाने उघडली आहेत. दोन वर्षांसाठी दीड लाखांपासून ते साडेतीन लाखांपर्यंतची फी क्लासवाले घेऊ लागले आहेत.
कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घेणे सोयीस्कर आहे हे क्लासवालेच विद्यार्थी, पालकांना सांगतात व टायअप असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याबाबतची सर्व प्रवेश प्रक्रियाही क्लासवालेच पूर्ण करुन देत असल्याचे आढळून येत आहे. महाविद्यालयात नावापुरता प्रवेश घ्यायचा अन हजेरी मॅनेज करायची जबाबदारीही क्लासवाले घेतात. अकरावीच्या पहिल्या नियमित प्रवेश फेरीसाठी 42 हजार 239 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालेला असताना त्यातील 27 हजार 255 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही विद्यार्थ्यांनी तिथे प्रवेश घेण्याऐवजी अन्यत्र प्रवेशाठी दुसऱ्या फेरीची वाट पाहत आहेत.
महाविद्यालयांना धाकच नाही…
अकरावीत असलेले विद्यार्थी बारावीत गेल्यानंतर त्यांना काही विषय बदलायचे असल्यास त्याबाबतची प्रक्रियाही सहजासहजी लवकर पूर्ण करुन दिली जात नसल्याने विद्यार्थीही हैराण होतात. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा कनिष्ठ महाविद्यालयांवरच काहीच धाक राहिला नसल्यामुळे काही महाविद्यालये त्यांना जुमानतच नसल्याची बाब अनेकदा उघड होत आहे.