वर्धा- वर्धा येथे कपाशीची बोगस बियाणे तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी बुधवारी (ता. 14) धाड टाकली होती. या धाडीत कारखान्यातून तब्बल 1 कोटी 55 लाखांचे बोगस बियाणी जप्त करण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांच्या तपासात या बियाण्यांचे गुजरात कनेक्शन समोर आले आहे. एक कोटींचे हे बियाणे गुजरातमधून आणल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे.
वर्धा शहरातील म्हसाळा परिसरात हे बोगस बियाणे तयार केले जात होते. गेल्या काही दिवसांपासून हा बोगस बियाणे तयार करण्याचा कारखाना सुरू होता. या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव राजू जैस्वाल असे आहे. विशेष म्हणजे आपल्या राहत्या घरीच त्याने बोगस बियाणे बनवायला सुरूवात केली होती. त्यामुळे आजुबाजूच्या रहिवाशांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. अखेर रहिवाशांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अचानक घरी धाड टाकल्यानंतर हा प्रकार समोर आला.
14 टन माल विकला
पोलिसांनी घरातून बियाणे निर्मितीचे साहित्य, नामांकित कंपनीचे रॅपर जप्त केले आहेत. आरोपीने गुजरातमधील व्यापाऱ्यांकडून हे बियाणे वर्ध्यात आणले होते. घरीच बोगस बियाणे तयार करुन त्यावर नामांकित कंपन्यांचे रॅपर लावून आरोपी त्यांचीं विक्री करत होता. धक्कादायक म्हणजे आतापर्यंत आरोपीने 14 टन माल शेतकऱ्यांना विकला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपी वेगवेगळ्या कृषी केंद्रामार्फत आणि खासगी कृषी केंद्रामार्फत या बोगस बियाणांची विक्री करत होता. अशाच पद्धतीने सेलू, नागपूर, वर्धा, यवतमाळ यांच्यासह इतर ठिकाणी आरोपीने 14 टन बोगस बियाण्यांची विक्री केली आहे.