मान्सूनचा अंदाज घेत धुळवाफेतील भात पेरण्या अंतिम टप्प्यात
इंद्रायणी, पार्वती, पूनम, रत्नागिरी 24 बियाणांची खरेदी
हिरडस मावळ – भोर तालुक्यातील पश्चिम भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी व्यापलेला असून, या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असतो. त्यामुळे या भागात पारंपरिक पध्दतीने मान्सूनचा अंदाज घेऊन धुळवाफेत भात पिकाची पेरणी केली जाते. 7 जूनला सर्रास पाऊस पडायला सुरुवात होतो, त्यामुळे मेच्या शेवटच्या आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात येथील शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांपासून पेरणीला सुरुवात केली आहे. धुळवाफेतील पेरणी अंतिम टप्प्यात आली असून पावसाच्या तोंडावर पेरणी राहिलेल्या शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे आणि पेरणी झालेले शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
हिरडस मावळसहित पश्चिम भागात भात हेच प्रमुख पीक आहे. या पिकावरच शेतकऱ्याचे वर्षभराची आर्थिक गणिते अवलंबून असतात. या भागात पर्जन्यमान मोठ्या स्वरूपात असते, त्यामुळे या भागातील शेतकरी पूर्वीपासून भात पेरणी आधी भात तरव्याची जागेची कवळे करून भाजणी केली जाते. त्यानंतर पावसाच्या तोंडावर धूळवाफेतच पेरणी केली जाते.
पूर्वी भात पिकाबरोबरच नाचणी, वरईची पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जात असत; परंतू हल्ली नाचणी-वरईची शेती कमी झाल्याचे दिसून येत आहे. सध्या नाचणी-वरईची पेरणीही सुरू आहे. शेतकऱ्यांना नाचणी लागवड करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करून त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. नाचणी बियाणे, खते व औषधे पुरविण्यात येत आहे; पण म्हणावा तसा प्रतिसाद नाही. शेतकरी वर्गाने नाचणी लागवडीकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. या भागात इंद्रायणीबरोबरच, पार्वती, वरंगाळ, राशी पूनम, रत्नागिरी 24 अशी विविध जातीची बियाणे खरेदी करून पेरणी केली आहे.
7 जूनला पावसाला सुरुवात होते परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे गेली काही वर्षे पावसाचा नियमितपणा राहिला नाही. अवकाळी पाऊस जवळ जवळ प्रत्येक महिन्यात पडत आहे. या वर्षी अजून पावसाला सुरुवात झाली नसल्याने पेरण्या उशिरापर्यंत सुरू होत्या. चार दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने जमिनीला वाफसा मिळाला होता; परंतू अजून एका पावसाची गरज आहे.
धूळ वाफेतील पेरणी
तरव्याच्या जागी कवळे करून भाजणी केली जाते. भाजणी केल्याने जमिनीतील कीटक जंतू नष्ट होतात, तसेच पाऊस पडण्यापूर्वी धूळवाफेत पेरल्याने जोराचा पाऊस सुरू होण्यापीर्वीच उगवण होते, त्यामुळे दाणा वाया जात नाही. वेळेवर उगवण होते त्यामुळे वेळेवर लावणी होऊन उत्पादनात वाढ होते.
आठ दिवसांपूर्वी भाताची पेरणी केली, त्यानंतर अवकाळी पाऊस पडला, त्यामुळे आता उगवण होऊ लागली आहे; परंतु अजून एक पाऊस पडला तर पहिल्या पावसात जागोजागी आलेला मातीचा थर बाजूला होऊन पिकांची उगवण चांगली होईल तसेच दाणा पिठाळणार नाही अन्यथा दुबार पेरणीचे संकट येऊ शकते.
– अंकुश धामुनसे, शेतकरी, हिर्डोशी