मुंबई – राज्यपालांकडून होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका रमेश बैस यांनीही कायम राखली आहे. जंजिरा किल्ला बाजीराव पेशव्यांनी जिंकल्याचे वक्तव्य रमेश बैस यांनी केले आहे. बाजीराव पेशव्यांबाबत ही चुकीची माहिती राज्यपालांना कुणी मुद्दाम दिली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जंजिरा किल्ला हा मराठ्यांनी जिंकण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता, पण त्यात त्यांना अपयश आले होते. सतराव्या शतकात अंबर सिद्दीने जंजिरा किल्ल्यावर सत्ता प्रस्थापित केली होती. त्यानंतर जवळपास 330 वर्षे हा किल्ला सिद्दीकडेच राहिला होता. सिद्दीनी इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करल्यामुळे सिद्दीच किल्लेदार राहिले होते. स्वातंत्र्यानंतरच्या संस्थान विलिनिकरणानंतर हा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात आला होता.
दरम्यान, तत्कालीन राज्यपाल असलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली होती. महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कोश्यारी चांगलेच अडचणीत आले होते. या वक्तव्यांमुळे विरोधकांनी त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनही केले होते. एवढच नाही तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनीही त्यांच्या वक्तव्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती.