पुणे – ओडिशा रेल्वे अपघातानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत 288 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी झाले आहे. अद्यापही घटनास्थळी वेगाने बचाव कार्य सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या अपघातानंतर मोठा आवाज झाला होता. त्यानंतर तेथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदत कार्य सुरु केले.
अपघातानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये आले आणि ते तातडीने ओडिशातील अपघातस्थळी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी अपघातस्थळी पाहणी केली आणि घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळावरून कॅबिनेट सचिव आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी जखमींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यास सांगितले. तसेच, हा सर्वात मोठा अपघात असून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, यावर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “रेल्वे अपघातानंतरनंतर काही व्हिडिओ समोर आले आहेत. एका व्हिडीओमध्ये मृतदेहांना टेम्पोमध्ये भरून घेऊन जाताना दिसत आहे. स्वत:ला विश्वगुरू म्हणून घेणारे आणि त्यांचे भक्त त्यांची आरती ओवाळत असतात. ते अँब्युलन्स देत नसतील तर ते कसले विश्वगुरू?’ असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.
त्या पुढे म्हणाल्या, ‘मृतांचा आकडा हा 700 पर्यंत जावू शकतो, सिग्नल वेळेवर दिला नाही म्हणून अपघात झाला. यावर पंतप्रधान यांनी ठोस भूमिका घ्यायला हवी होती. 10 लाख रुपये माणसाच्या जीवनाची किंमत असू शकत नाही, हे मोदी यांनी लक्षात घ्यावे. नैतिकता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे होता..’ असं देखील सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.