पारनेर – नवीन शैक्षणिक वर्षे चालू झाले असून, पालकांची पाल्याला शाळेत प्रवेश घेण्यासाठी धावपळ चालू झाली आहे. पालक खासगी शाळेलाच प्राधान्य देत आहेत तर खासगी शाळांच्या भरमसाट फीमुळे पालकांचे कंबरडे मोडले आहे. मे महिना संपत आला की, पालक वर्गाची मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी धावपळ चालू होते. यात पालकांपुढे दोन पर्याय असतात.
एक संपूर्ण मोफत शिक्षण असलेल्या सरकारी जिल्हा परिषद शाळा व दुसरा पर्याय संपूर्ण विकत पैसे मोजून शिक्षण असलेल्या खासगी शाळा. या दोन्ही शाळांत मोठा फरक आहे. तरीही पालक खासगी शाळांमध्ये पैसे मोजून शिक्षणाला प्राधान्य देताना दिसत आहेत. याचे मुख्य कारण सरकारी शाळांत शिक्षणाचा दर्जा खालावला आहे का? शिक्षक आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नाही, हे न उलगडणारे कोडे आहे.
खासगी शाळांत पालकांकडून भरमसाट फी उकळली जाते. त्यानंतर वर्षभराचे बसभाडे आकारले जाते. मुलांची पाटी, पेन्सिलपासून पुस्तके बॅंगापर्यंत तर पायाच्या मोज्यांपासून ते अंगातील कपड्यापर्यंत प्रत्येक गोष्ट शाळेतून खरेदी करावयास लावली जाते. या खासगी शाळांची सततची फी वाढ सर्वसामान्यांच्या मुलांना मात्र आधुनिक शिक्षणापासून दूर ठेवत आहे. त्याच्यावर नियंत्रण कुणाचे आहे की नाही, हे समजायला मार्ग नाही.
सरकारी शाळेत प्रवेश मोफत, कपडे मोफत, वह्या पुस्तके मोफत, रोज पोषण आहार मोफत, कसलीही फी नाही. कुठून काही खरेदी करा, असा आग्रह नाही तरी पण पालक मुलांना सरकारी शाळेत प्रवेश घेण्यास टाळाटाळ का करतात, यावर कुठेतरी विचार झाला पाहिजे.
जिल्ह्यासह राज्यात आजही अशा काही शाळा आहेत की ज्या खासगी शाळांच्या कितीतरी पटीत पुढे आहे. याचे सर्व श्रेय त्या शाळांमध्ये मेहनत घेणाऱ्या शिक्षकांना आहे. जर बोटावर मोजण्याइतकेच शिक्षक आदर्श शाळा बनवत असतील तर मग इतर शिक्षक काय नुसताच पगार घेतात काय, असा प्रश्न पालक वर्ग विचारत आहे.