नवी दिल्ली – शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेचे भारताकडून आयोजन केले जाणार आहे. दिनांक 4 जुलै रोजी आभासी माध्यमातून ही परिषद आयोजित केली जाणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने आज जाहीर करण्यात आले. मात्र ही परिषद आभासी माध्यमातून आयोजित करण्यामागील कारण स्पष्ट केले गेलेले नाही.
गेल्या वर्षी “एससीओ’ ची परिषद उझबेकिस्तानमधील समरकंद येथे प्रत्यक्ष आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह सर्व सदस्य देशांचे प्रमुख नेते प्रत्यक्ष उपस्थित राहिले होते.
गेल्या वर्षी 16 सप्टेंबर रोजी समरकंद शिखर परिषदेत भारताने “एससीओ’चे फिरते अध्यक्षपद स्वीकारले. या संघटनेच्या 22 व्या सत्राचे अध्यक्षपद भारताकडे आल्यामुळे ही परिषद आबासी माध्यमातून 4 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसांची बैठक या महिन्यात गोव्यामध्ये झाली. जुलैमध्ये होणाऱ्या परिषदेत सहभागी होण्यासाठी चीन, रशिया, कझाकिस्तान, किरगिझस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या सदस्य राष्ट्रांना आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय इराण, बेलारूस आणि मंगोलिया या देशांना निरीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. तुर्कमेनिस्तानलाही अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.